Premium

‘ती’ मोदी सरकारची आवडती स्टंटबाजी होती?’ ठाकरे गटाचा सवाल; ओडिशा रेल्वे अपघातावरून टीकास्र!

“बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा…!”

uddhav thackeray narendra modi (5)
ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये आत्तापर्यंत २८८ जणांचा मृ्त्यू झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयांत उपचार चालू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातस्थळी बचावकार्यही पूर्ण झालं असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल. मात्र, या अपघातामुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर आता चर्चा चालू झाली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भीषण दुर्घटनेला नेमकं कारणीभूत कोण? याच मुद्द्यावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. शिवाय, वर्षभरापूर्वी मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाचीही आठवण करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या…”

“मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. २८८ प्रवाशांचा बळी घेणारा आणि ९००च्या वर प्रवाशांना जखमी करणारा हा अपघात कसा घडला याची प्राथमिक कारणे आता समोर येत आहेत. पुढील तपासात आणखी तपशील समोर येईल, पण शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघाताने आजही देशातील रेल्वे प्रवास असुरक्षित असून रेल्वे प्रवाशांचे जीवन क्षणभंगूर, बेभरोसे असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे.

“मोदी सरकारच्या ‘त्या’ दाव्यांवरच प्रश्नचिन्ह”

“बालासोरचा अपघात मागील दोन दशकांतील सर्वात मोठा आणि भीषण म्हटला जात आहे. त्याहीपेक्षा मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचा विकास आणि सुरक्षितता यासंदर्भात जे दावे ठोकले जात आहेत, त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही दुर्घटना आहे. बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली आहे”, अशी खोचक टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे; विनोद तावडे यांचे आवाहन

“दोन रेल्वेंमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ‘संरक्षण कवचा’चा उदोउदो रेल्वेमंत्र्यांनी गेल्या वर्षी केला होता. हे संरक्षण कवच म्हणजे रेल्वे दुर्घटना रोखणारी मोठी क्रांती (भक्तांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’) असून एकाच रेल्वेमार्गावर समोरासमोर ट्रेन्स आल्या तरी या संरक्षण प्रणालीमुळे त्या आधीच थांबतील आणि टक्कर टळेल असे सांगितले गेले होते. स्वतः रेल्वेमंत्र्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मग तरीही शुक्रवारची भीषण रेल्वे दुर्घटना घडलीच कशी? कुठे गेले तुमचे ते ‘संरक्षण कवच’? जनतेला दाखविलेली ही ‘कवचकुंडले’ फक्त रेल्वेमंत्र्यांनी प्रात्यक्षिक दाखविलेल्या रेल्वे गाडय़ांनाच होती, असे आता म्हणायचे का?” असा सवालही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

“…तर कदाचित अपघात टळला असता”

“संरक्षण कवचाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जाईल, या तुमच्या आश्वासनाचे काय झाले? अपघातग्रस्त गाडय़ांना ती प्रणाली असती तर कदाचित शुक्रवारची भयंकर दुर्घटना टळली असती आणि अनेकांचे प्राण वाचले असते. मात्र सरकारच्या सुरक्षित रेल्वे प्रवासाच्या या क्रांतीचे बिगुल बालासोरमधील अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा, आक्रोश, मरणप्राय वेदना आणि दुःखावेगात विरून गेले आहेत. संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर त्यावर सरकारकडे काय उत्तर आहे?” असाही प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray fraction slams modi government on odisha train accident pmw

First published on: 05-06-2023 at 07:51 IST
Next Story
ज्ञानवापीमधील हिंदू पक्षकारांमध्ये मतभेद; प्रमुख याचिकाकर्त्यांची खटल्यांमधून माघार