देशातील पाच रेल्वेस्थानकांवर विनामुल्य हाय-स्पीड वायफाय सेवा सुरू करण्याची घोषणा गुगलतर्फे सोमवारी करण्यात आली. उज्जैन, जयपूर, पाटणा, गुवाहाटी आणि अलाहाबाद रेल्वेस्थानकांवर गुगलने ही सेवा सुरू केली. वर्षाखेरपर्यंत देशातील १०० रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे गुगलने एका निवेदनाद्वारे जाहीर केले. वरील पाच स्थानकांवर सुरू करण्यात आलेली ही सुविधा याच योजनेचा भाग असून, लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सुविधेचे लोकार्पण करतील. गुगलने आपल्या या सेवेसाठी भारतीय रेल्वेच्या रेलटेल या फायबर नेटवर्कचा वापर केला आहे. या पाच रेल्वे स्थानकांची भर पडताच देशभरातील १५ रेल्वेस्थानकांवर ही सेवा उपलब्ध असेल. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील या सुविधेला येत असलेला चांगला प्रतिसाद पाहून कंपनी दादर, वांद्रे, चर्चगेट, ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, कुर्ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, बोरिवली आणि इतर अनेक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करणार आहे.