केरळमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलवणारे आणि पहिल्याच खेपेस निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळवणाऱ्या सुरेश गोपी यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया म्हटले आहे. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते के. करुणाकरण यांनाही त्यांनी उत्तम प्रशासक असल्याचे संबोधले. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याचे सांगून सुरेश गोपी यांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर करुणाकरण आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते ई. के. नयनार यांना सुरेश गोपी यांनी आपले राजकीय गुरू असल्याचे संबोधले आहे. या दोन्ही नेत्यांचा आपल्या राजकीय वाटचालीवर प्रभाव असल्याचे सांगून त्यांनी केरळच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
भाजपा आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असताना सुरेश गोपी यांनी केलेल्या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोपी यांनी केरळच्या पुनकुन्नम येथील करुणाकरण यांच्या मुरली मंदिर या स्मारकाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या नेत्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष बाब म्हणजे, सुरेश गोपी यांनी करुणाकरण यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते के. मुरलीधरन यांना त्रिशूर लोकसभा मतदारसंघात पराभूत केले. मुरलीधरन यांचा तब्बल ८४ हजार मतांनी पराभव झाला. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. मुरली मंदिराला भेट दिल्यानंतर सुरेश गोपी यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, अशी विनंती केली. तसेच आपण येथे आपल्या गुरुला श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी आलो आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना सुरेश गोपी यांनी इंदिरा गांधी या मदर ऑफ इंडिया असल्याचे म्हटले. तर करुणाकरण यांना ते राज्यातील काँग्रेस पक्षाचे पितामह समजतात, असेही सांगितले. सुरेश गोपी हे अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री करुणाकरण यांच्या प्रशासकीय कौशल्यांचीही प्रशंसा केली.
मुरली मंदिर व्यतिरिक्त गोपी यांनी शहरातील प्रसिद्ध अशा लॉर्डे माता चर्चलाही भेट दिली. सुरेश गोपी यांच्या विजयामुळे भाजपाने दक्षिणेतील राज्यात चंचूप्रवेश केला असल्याचे म्हटले जाते. गेले अनेक वर्ष भाजपा केरळमध्ये कमळ रुजविण्याच्या प्रयत्नात होते. यंदा त्यांना यश मिळाले. सुरेश गोपी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षातील तगड्या उमेदवारांशी होता. मात्र त्यांनी चांगल्या फरकाने भाजपाला विजय मिळवून दिला.
© IE Online Media Services (P) Ltd