उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाचारानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. विरोधीपक्षांकडून पीडित कुटुंबांना भेटण्याचा प्रयत्न होतोय, मात्र उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना रोखलं जातंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत तर धक्काबुक्कीचेही आरोप झाले. आता भाजपच्या माजी खासदाराचे केस ओढून धक्के मारत पोलीस गाडीत लोटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वतः प्रियंका गांधी यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत या घटनेचा निषेध केलाय.

भाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले (BJP Ex MP Savitri Bai Phule) लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचे केस ओढत, धक्के मारत पोलीस गाडीत घातल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांच्या या गैरव्यवहारावरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर जोरदार टीका होतेय. प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत म्हटलं, “सावित्री तुमच्यासोबतचं हे वर्तन पाहून दुःख झालं. टिकून राहा, लढत राहा.”

खैराच्या लाकडांची चोरी आणि नेपाळमध्ये खतांची तस्करी करणारा गृहमंत्री झाला…, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

सावित्रीबाई यांच्यासोबतच्या पोलीस गैरव्यवहाराच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिलं, “या कुणी सामान्य महिला नाहीत तर माजी आमदार आणि माजी खासदार आहेत. त्या शेतकऱ्यांच्या प्रति आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी लखीमपूरला जात होत्या हाच त्यांचा दोष आहे.”

कोण आहेत सावित्रीबाई फुले?

सावित्रीबाई फुले यांचं वयाच्या ६ व्या वर्षीच लग्न झालं होतं, मात्र सज्ञान झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. सावित्रीबाई फुले यांना २०१२ मध्ये भाजपने बलहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सावित्रीबाई ही निवडणूक जिंकल्या. यानंतर २०१४ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. त्यांनी ही निवडणूक जिंकत खासदार म्हणून संसदेत पाऊल ठेवलं.

लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार

सावित्रीबाई फुले भाजपचा अनुसूचित जातीतील महत्त्वाचा महिला चेहरा मानला जात होत्या. मात्र, ६ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी लखनऊमध्ये भाजपवर समाजात फूट पाडण्याचा आरोप करत पक्ष सोडला. त्यानंतर त्यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वर्षभरात त्यांनी काँग्रेसमध्ये आपला आवाज ऐकला जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी कांशीराम बहुजन समाज पक्षाची स्थापना केली.