राहुल गांधी यांनी पाच वर्षांपूर्वीच पक्षाची सूत्रे हाती घेतली असती तर आज काँग्रेस पक्ष आणि युपीए सरकारची परिस्थिती वेगळी असती, असे मत केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आताच्या घडीला आपल्या गाठीशी अनुभव असल्याचा दावा राहुल गांधी यांना करता आला असता. राहुल गांधी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर काँग्रेस आणि एकुणच युपीए सरकारला निश्चितच वेगळ्या स्थितीत आणून ठेवले असते. २००९ साली काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हाच सरकार चालवण्यात राहुल यांनी पुढाकार घेतला पाहिजे होता असे माझ्यासह पक्षातील त्यांच्या अनेक सहका-यांना वाटत आहे. मात्र, आता भुतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काही अर्थ नसून राहुल गांधींनी त्यावेळी पक्षाची सूत्रे स्विकारली नाहीत हे सत्य स्विकारलेच पाहिजे असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.