संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाल भ्रष्टाचाराने भरलेला आहे, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या भ्रष्टाचाराने भरलेल्या पेल्यातून सामान्य व्यक्तीला काहीतरी घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास ठेवण्यास जागाच नसल्याचा आरोप मोदींनी केला.
उद्योगविषयक परिषदेच्या उद्घाटनानंतर बोलताना मोदींनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा खराब कारभार आणि धोरण लकवा यामुळे सामान्य व्यक्तीचे जगणे अवघड झाल्याची टीका केली. केंद्र सरकारने राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सरकारी संस्थांचा दुरुपयोग केल्याची टीका केली. गेल्या आठवडय़ात इन्फोसिसने गुजरातचे कौतुक केल्यावर त्यांना आयकर खात्याने ५०० कोटींची नोटीस पाठवली. त्यामुळे तुम्ही काय बोललात ते मी ऐकले नाही, अशी टिप्पणी इन्फोसिसचे कार्यकारी सहअध्यक्ष क्रिश गोपालकृष्णन यांच्याकडे पाहात केली.