१९९७ मध्ये घडलेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडव प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी व्यापारी सुशील अन्सल आणि गोपाल अन्सल आणि इतरांना महत्त्वपूर्ण पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यासोबतच न्यायालयाने दोन्ही अन्सल बंधूंना २.२५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पटियाला हाऊस कोर्टातील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पंकज शर्मा यांच्या कोर्टाने सोमवारी उपहार आग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सुशील आणि गोपाल अन्सल यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना २.२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेश चंद शर्मा आणि पीपी बत्रा आणि अनूप सिंग या दोघांनाही सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनेक विचारानंतर न्यायालय या निष्कर्षावर पोहोचले आहे की, पाच दोषी कठोर शिक्षेचे पात्र आहेत, असे न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणातील निकालानंतर जामिनावर बाहेर असलेल्या पाच दोषींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने गेल्या महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी व्यापारी सुशील आणि गोपाल अन्सल यांच्यासह त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना उपहार आगीच्या घटनेत महत्त्वाच्या पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल दोषी ठरवले होते. या प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी पंकज शर्मा यांनी न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेशचंद शर्मा आणि इतर व्यक्ती पी.पी. बत्रा आणि अनूप सिंग यांनाही दोषी ठरवले. https://twitter.com/ANI/status/1457641687543533573?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1457642014418235393%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2F या दुर्घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात अन्सल बंधूंना दोषी ठरवण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, तुरुंगात घालवलेला वेळ लक्षात घेऊन राजधानी दिल्लीत ट्रॉमा सेंटरच्या बांधकामासाठी दोघांनाही प्रत्येकी ३० कोटी रुपये द्यावे लागतील, या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली. अन्य दोन आरोपी हर स्वरूप पनवार आणि धरमवीर मल्होत्रा यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. १३ जून १९९७ रोजी बॉर्डर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दिल्लीच्या ग्रीन पार्क परिसरातील उपहार सिनेमाला भीषण आग लागली, ज्यामध्ये ५९ लोकांचा मृत्यू झाला होता. संध्याकाळी उपहार चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सिनेमा सुरू होऊ अर्धा तास झाल्यानंतर चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आगीची ठिणगी पडली. काही वेळातच आग चित्रपटगृहाच्या हॉलमध्ये पसरली होती. या अपघातात शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. न्यायालयाने सुनावलेल्या या निर्णयाचे उपहार पीडित संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयावर युनियनने समाधान व्यक्त केले आहे.