Inspiring UPSC Success Story of Ramanathan sisters who turned struggles into administrative glory: आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी जिद्द आणि चिकाटी असेल, तर यशाचे शिखर गाठता येते, हे तामिळनाडूतील दोन बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सुष्मिता रामनाथन आणि ईश्वर्या रामनाथन या दोन बहिणींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. ईश्वर्या २०१९ मध्ये आयएएस (IAS) अधिकारी बनली, तर तिची बहीण सुष्मिता हिने २०२२ मध्ये आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली.

त्सुनामीचे संकट आणि संघर्षाचा काळ

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबात या दोन्ही बहिणींचा जन्म झाला. २००४ मध्ये आलेल्या विनाशकारी त्सुनामीमध्ये त्यांचे घर उद्ध्वस्त झाले होते. आर्थिक चणचण आणि डोक्यावर छप्पर नसतानाही या बहिणींनी हार मानली नाही. शिक्षणानेच आपले नशीब बदलू शकते, या विश्वासाने त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिले.

ईश्वर्याचा थक्क करणारा प्रवास

मोठी बहीण ईश्वर्याने २०१८ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. मात्र, ६२८ वा रँक मिळाल्याने तिची निवड रेल्वे अकाउंट्स सर्व्हिसमध्ये (RAS) झाली. या निकालाने समाधानी न होता तिने पुन्हा प्रयत्न केला आणि २०१९ मध्ये देशात ४४ वा रँक पटकावून आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. अवघ्या २२ व्या वर्षी ती तामिळनाडू केडरची आयएएस अधिकारी बनली. सध्या ती थूथुकुडी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहे.

पाच वेळा अपयश, पण सहाव्या प्रयत्नात सुष्मिता ‘आयपीएस’

सुष्मिताचा प्रवास अधिक खडतर होता. तिला सुरुवातीच्या पाच प्रयत्नांत अपयश आले. सलग पाच वेळा अपयशी ठरूनही तिने जिद्द सोडली नाही. अखेर २०२२ मध्ये आपल्या सहाव्या प्रयत्नात तिने ५२८ वा रँक मिळवला आणि ती आयपीएस अधिकारी बनली. सध्या ती आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

जिद्द आणि सातत्य

यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नाही, तर प्रचंड संयम लागतो हे या दोन्ही बहिणींच्या प्रवासातून दिसून येते. “प्रयत्न करत राहिल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” हा संदेश या दोन्ही बहिणींनी आपल्या कृतीतून आजच्या तरुण पिढीला दिला आहे.

आज या दोन बहिणी केवळ तामिळनाडूच्याच नव्हे, तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. एका शेतकऱ्याच्या मुलींनी शून्यातून विश्व निर्माण करत प्रशासकीय सेवेत मिळवलेले हे स्थान अभिमानास्पद आहे.