उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. 16 मे रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आलेल्या पत्रावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. याची तक्रारही करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी त्यांना नवी पदं देण्यात आली, असं म्हणत उर्मिला यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या पत्रातील माहिती गोपनीय राहणे आवश्यक होती. परंतु त्या पत्रातील माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली. आपण अनेकदा नाराजी व्यक्त केली परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. पक्षांतर्गत राजकारणात आपल्याला कोणताही रस नाही. तसंच राजकारणासाठी आपला वापर होऊ नये यासाठी आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. तसंच यापुढेही सामाजिक कार्यात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेससोबतच असणार आहे असे त्या पक्षप्रवेशादरम्यान म्हणाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या समोर भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान होते. त्या गोपाळ शेट्टी यांना काँटे की टक्कर देतील असं म्हटलं जात होतं. परंतु निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला होता.