US advisory for personnel citizens in Pakistans Lahore Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. यादरम्यान संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली आहे. याबरोबरच पाकिस्तानकडून होणार्या कारवायांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेल्या त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ड्रोनचे स्फोट, ड्रोन पाडल्याचे तसेच लाहोरच्या जवळपासच्या हवाई हद्दीत घुसखोरी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या लाहोरमधील त्यांच्या वाणिज्य दूतावासातील सर्व कर्मचार्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
अमेरिकने जे नागरिक संघर्ष सुरू असलेल्या ठिकाणांच्या जवळपास असतील, त्यांना सुरक्षितपणे शक्य असल्यास तो भाग सोडावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाहेर पडणे सुरक्षित नसेल तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे अमेरिकेकडून त्यांच्या नागरिकांना सांगण्यात आले आहे.
अमेरिकेने संघर्ष सुरू असलेल्या भागात असलेल्या त्यांच्या नागरिकांनी काय करावे याबद्दलही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्याव, अमेरिकन सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता बाहेर पडण्याची योजना तयार ठेवावी, प्रवासासंबंधी कागदपत्रे अपडेट असतील याची काळजी घ्यावी आणि ती सोबत बाळगावीत तसेच पुढील माहितीसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे, योग्य ओळखपत्र बरोबर बाळगावे आणि अधिकार्यांना सहकार्य करावे, असे अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना कळवले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त
बुधवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. तर गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलानं लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. “पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल, त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिलं जाईल. अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे की लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहे”, असं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.