Illegal Indian Immigrants Return News Updates : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. ‘सी-१७’ या अमेरिकन लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून १०० हून अधिक बेकायदा स्थलांतरितांना भारतात आज आणले गेले. अमृतसर विमानतळावर हे विमान लँड झाले आहे. यामध्ये तीन महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे.
सुरुवातीला सकाळी हे विमान उतरवण्यात येणार होते. परंतु विमानाच्या आगमनाच्या आधीच मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पंजाब सरकारने लोकांना राज्यातील त्यांच्या ठिकाणी परत नेण्यासाठी मिनीबसची व्यवस्था केल्याचे वृत्त आहे.
हरियाणा, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंदीगड येथून निर्वासित केलेल्या १०४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी सी-१७ विमान आज दुपारी अमृतसर विमानतळावर उतरले. मंगळवारी दुपारी टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून निघालेल्या या विमानात ११ क्रू मेंबर्स आणि ४५ अमेरिकन अधिकारी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक ३३ जण गुजरात आणि हरियाणाचे आहेत, त्यानंतर ३० जण पंजाबचे आहेत. प्रत्येकी दोन प्रवासी उत्तर प्रदेश आणि चंदीगडचे आहेत , तर तीन महाराष्ट्राचे आहेत.
१२ अल्पवयीन मुलांचाही समावेश
निर्वासितांमध्ये २५ महिला आणि १२ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वात लहान प्रवासी फक्त चार वर्षांचा आहे. ४८ व्यक्ती २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबमधून हद्दपार झालेल्या ३० जणांपैकी बहुतेक जण गुरुदासपूर, अमृतसर आणि तरनतारनसह माढा पट्ट्यातील आहेत. तर इतर जालंधर , नवांशहर, पटियाला, मोहाली आणि संगरूर येथील आहेत.
US aircraft carrying illegal Indian immigrants lands at Amritsar airport
— Press Trust of India (@PTI_News) February 5, 2025
पंजाबमधील असोसिएशन ऑफ कन्सल्टंट्स फॉर ओव्हरसीज स्टडीज (एसीओएस) चे कार्यकारी सदस्य नितीन चावला म्हणाले, “पूर्वी कॅनडाने भारतीयांना परत पाठवले होते आणि आता अमेरिका पाठवत आहे आणि त्यांनी २०,००० हून अधिक जणांची यादी तयार केली आहे. निःसंशयपणे, आम्ही त्यांचे मायदेशी परत स्वागत करत आहोत पण ही आत्मपरीक्षणाची बाब आहे. मला असे वाटते की जे परत येत आहेत त्यांना बेकायदेशीरपणे पाठवलेल्या लोकांबद्दल विचारले पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल. शिवाय, गेलेले लोक देखील जाणूनबुजून बेकायदेशीर मार्गांनी जात होते.”