नवी दिल्ली : भारत वा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा होण्याआधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरून शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताने अमेरिकेची मध्यस्थी मान्य केल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र दोन्ही देशांच्या लष्कराच्या संचालनाचे महानिर्देशकांमध्ये झालेल्या थेट चर्चेनंततरच शस्त्रसंधी झाल्याचे भारताने म्हटले आहे.
‘‘अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यासाठी रात्रभर दोन्ही देशांशी दीर्घ चर्चा केल्यानंतर शस्त्रसंधी केली गेली. दोन्ही देशांनी तातडीने शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला ही माहिती देण्यास मला आनंद होत आहे,’’ असे ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर लिहिले. इतकेच नव्हे तर त्यांनी ‘‘सदसदविवेकाचा (कॉमन सेन्स) आणि कुशाग्र बुद्धीचा (ग्रेट इंटेलिजन्स) वापर केल्याबद्दल मी दोन्ही देशांचे अभिनंदन करतो,’’ असे टोमणेही त्यांनी मारले.
लष्करी कारवाईची तीव्रता कमी होत नसल्याचे लक्षात येताच पडद्यामागून अमेरिकेने दोन्ही देशांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
कारगीलच्या युद्धातही अमेरिकेने मध्यस्थी केली होती. यावेळीही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री व अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो व उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी थेट संवाद साधला. गेले ४८ तास भारत व पाकिस्तानशी चर्चा केली जात होती, अशी माहिती रुबियो यांनी एक्सवरून दिली. त्यामुळे अमेरिकेकडून केल्या गेलेल्या मध्यस्थीचे स्वरुप स्पष्ट झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, वादग्रस्त लष्करप्रमुख असीम मुनीर, पाकिस्ताने सुरक्षा सल्लागार असीम मलिक यांच्याशी रुबियो व व्हान्स सातत्याने संपर्कात होते, ही बाबही शनिवारी अमेरिकेच्या मंत्र्यांनी उघड केली. मोदी व शरीफ यांच्या परिपक्व नेतृत्वांमुळे शस्त्रसंधी होऊ शकली, अशी प्रशंसा रुबियो यांनी केली. रुबियो यांच्या एक्सवरील संदेशनंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशक दार यांनाही शस्त्रसंधी झाल्याची अधिकृत घोषणा केली. मात्र द्विपक्षीय चर्चेतूनच शस्त्रसंधी झाल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यातून पाकिस्तानने तंबी दिल्यानंतरच शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.