Donald Trump Reaction on Indian Air Strike: मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं. या एअर स्ट्राईकमध्ये भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या या कारवाईवर देशभरातून स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देताना ही लाजिरवाणी बाब असल्याचं नमूद करत डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काहीतरी होईल, असा अंदाज सगळ्यांनाच होता, असं म्हटलं आहे. “ही एक लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईकसंदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होतं. भारत व पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्षं नव्हे तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की हे सगळं लवकर संपावं”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

भारताच्या अमेरिकेतील दूतावासाकडून निवेदन जारी

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या अमेरिकेतील दूतावासाकडून निवेदन जारी करण्यात आलं असून अजित डोवाल यांनी मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यात दिली आहे. “भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केल्यानंतर थोड्याच वेळात केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली”, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, अमेरिकेप्रमाणेच भारत सरकारनं इतर देशांमधील उच्चपदस्थांनाही ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकबाबत माहिती दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे. त्यात अमेरिकेसह यूके, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व रशिया यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया

“पहलगाम हल्ल्यानंतर अशी आशा होती की पाकिस्तान दहशतवाद्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेबाबत कारवाई करेल. पण त्याऐवजी पहलगाम हल्ल्यापासून गेल्या १५ दिवसांत पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यातील सहभागाचं सत्य फेटाळणं आणि भारतावर तथ्यहीन आरोप करणं एवढंच केलं. पण भारतानं आज केलेला एअर स्ट्राईक पूर्णपणे लक्ष्यावर केंद्रीत होता. भारतीय हवाई दलानं अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीने आणि चोख कारवाई केली आहे. पाकिस्तानातील कोणताही सामान्य नागरिक, आर्थिक संस्था किंवा लष्करी तळ यांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. ज्या दहशतवादी तळांची माहिती होती, त्याच तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे”, अशी माहिती भारताच्या वॉशिंग्टन येथील दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.