चेन्नईमध्ये दहा वर्षांतील सर्वात मोठा पूर आल्यानंतर आता अमेरिकेने मानवतावादी तत्त्वावर भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले, की अमेरिका तामिळनाडूतील चेन्नईच्या लोकांना मदत करण्यास तयार आहे, पूरस्थिती हाताळण्यास भारत सरकारला मदत केली जाईल.पुरात जे लोक मरण पावले त्यांच्या नातेवाइकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. काही जण अजूनही पुरात अडकले असण्याची शक्यता आहे. अमेरिका भारत सरकारच्या संपर्कात आहे.
प्रतिकूल स्थितीत भारताला काही मदत करता येईल काय, याविषयी चर्चा सुरू आहे. भारताने मदतीची कुठलीही विनंती केलेली नाही. आम्ही मदत देण्यास तयार आहोत. भारत सरकारकडे पुरशी क्षमता आहे व ते आपत्कालीन मदत करू शकतात.
चेन्नईत अमेरिकेचा वाणिज्य दूतावास आहे याकडे लक्ष वेधले असता टोनर यांनी सांगितले, की या भागात पूर आल्याचा धोक्याचा संदेश आमच्या दूतांनी ३ डिसेंबरला पाठवला होता. आज व उद्या दूतावास बंद राहणार असून अमेरिकी नागरिकांना चेन्नईत न येण्याचा इशारा दिला आहे. दूतावासाच्या संकेतस्थळावर पूरस्थिती व त्या अनुषंगाने इतर माहिती देण्यात येत आहे. चेन्नईतील पुरात आतापर्यंत अडीचशे लोक मरण पावले आहेत.