US Travel Vlogger Post: एका अमेरिकन ट्रॅव्हल व्लॉगरने असा दावा केला आहे की, भारतात १५ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर त्याला श्वसनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. अमेरिकेच्या मिसूरी येथील निक मॅडॉकने गेल्या आठ वर्षांपासून जगभरात प्रवास करत आहे. प्रत्येक देशाला भेट दिल्यानंतर तो त्याचे त्या देशाबाबतचे अनुभव शेअर करतो. याचाच भाग म्हणून त्याने नुकताच भारत प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने भारतातील रेल्वे प्रवासाचा त्रास झाल्याचे सांगितले आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, मॅडॉकने ऑक्सिजन मास्क घातल्याचे दिसत आहे. पोस्टबरोबर त्याने भारतात १५ तासांच्या रेल्वे प्रवासामुळे त्याला गंभीर श्वसन संसर्ग झाल्याचे म्हटले आहे. “खरे तर मला अजूनही समजलेले नाही की, फुफ्फुसांचे नुकसान रेल्वे प्रवासामुळे झाले की वाराणसीत मृतदेहांच्या वातावरणात एक आठवडा राहिल्यामुळे. पण, आता फुफ्फुसे पूर्णपणे खराब झाली आहेत.” या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मॅडॉकने असेही लिहिले आहे की, “पुन्हा कधीच नाही.”

या पोस्टमध्ये अमेरिकन व्लॉगरने त्याच्या रेल्वे प्रवासाचा नेमका मार्ग कोणता होता किंवा कोणत्या तारखेला प्रवास केला हे सांगितले नाही, परंतु त्याने स्लीपर-क्लास कोचमध्ये १५ तास प्रवास केल्याचा दावा केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, मॅडॉकने ट्रेनमधील खराब अवस्थेतील एक शौचालय दाखवले आहे.

भारतातील एका ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये त्याच्या साहसावर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी शेअर केले की भारतीय ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर त्यांना कधीही आरोग्य समस्या आल्या नाहीत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “आम्हाला ही समस्या कधीच आली नाही!! ही जगातील पहिलीच समस्या आहे!!” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “कसे तरी त्याला असे डॉक्टर देखील सापडले जे निदान करू शकतील की श्वसनाच्या समस्या ट्रेन प्रवासामुळे आहेत.. आशा आहे की त्यांनी ते सीट आणि ट्रेन नंबरपर्यंत मर्यादित केले असेल.”

यापूर्वी कॅनेडियन पर्यटकाची पोस्ट झाली होती व्हायरल

दरम्यान काही दिवसांपूर्वी कॅनडातील एका पर्यटकाने भारताला भेट दिली होती. या भारत भेटी दरम्यान त्याने देशातील विविध भागांत तब्बल पाच आठवडे प्रवास केला होता. यानंतर विल्यम रॉसी नावाच्या या पर्यटकाने इन्स्टाग्रामवर त्याचा भारत भेटीचा अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला होता. पोस्टमध्ये त्याने, “मी भेट दिलेल्या ३७ देशांपैकी भारतातील अनुभव सर्वात धक्कादायक होते”, असे म्हटले होते.