रणधुमाळी

|| महेश सरलष्कर

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

उत्तर प्रदेश , पंजाब ,गोवा , उत्तराखंड , मणिपूर

उत्तर प्रदेशातील मतदारसंघांमध्ये जातींची अवघड समीकरणे सोडवल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी मात्र ही समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. उदाहरणार्थ, गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा विधानसभा मतदारसंघ..

बिगरजाटव दलित समाजामध्ये पासी (पासवान) आणि बिगरयादव ओबीसींमध्ये निषाद या दोन जाती भाजपला अनुकूल राहिल्या होत्या, पण चौरी चौरा मतदारसंघात यावेळी समाजवादी पक्षाने यादव उमेदवार न देता पासी समाजातील पायलट कॅप्टन ब्रिजेशचंद्र लाल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात निषादांची लोकसंख्या सर्वाधिक, मग यादव आणि पासवान समाज अशी क्रमवारी आहे. इथे पासी उमेदवारीमुळे यादव आणि पासी दोन्ही समाजांची मते ‘सप’ला मिळण्याची अपेक्षा आहे, पण पासी कट्टर यादवविरोधक आहेत.

या मतदारसंघात जगदीशपूर हे पासीबहुल गाव. या गावात ‘सप’चे कॅप्टन लाल पासी मतदारांना भेटायला आले होते, त्यांच्या भोवती यादव कार्यकर्त्यांचा गराडा होता. यादवांना बघून पासी मतदारांनी कॅप्टनना भेटायला नकार दिला. ‘‘यादवांना गावाबाहेर ठेवा, मग आत या’’, असे ठणकावून सांगितले. ‘‘आम्हाला यादव नकोत, निषादांशी काही वैर नाही’’, असे सजग ग्रामस्थ गौतम पासवान यांचे म्हणणे होते. या मतदारसंघात भाजपशी आघाडी केलेल्या निषाद पक्षाचे सर्वण निषाद यांना उमेदवारी दिली आहे. सर्वण हे निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांचे पुत्र.

ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे. त्यामुळे एक ओबीसी जात दुसऱ्या ओबीसी जातीच्या विरोधात उभी असते. या दलित आणि ओबीसी जाती यादवांच्या विरोधात एकत्र येतात. हे ‘बिगरजाटव, बिगरयादव’ सूत्र आत्तापर्यंत भाजपला लाभदायी ठरले होते. उत्तर प्रदेशमध्ये दलितांमध्ये जाटवांनंतर पासींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. बिगरजाटव, बिगरयादव जातींचे महत्त्व भाजपने खूप पूर्वी ओळखले, त्याचा लाभ विधानसभा-२०१७ आणि लोकसभा-२०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये झाला. आता समाजवादी पक्षाने यादवांच्या पलीकडे ओबीसी आणि दलित जातींचा आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. जगदीशपूरमध्ये पासींनी यादवांना विरोध केला असला तरी ‘सप’मधील स्वजातीच्या कॅप्टनला पासींची मते मिळणार नाहीत असे नव्हे!

‘‘पासी समाजाकडे भक्कम नेता नाही. मायावतींनी जाटव समाजाशिवाय अन्य दलित जातींना जवळ केले नाही, मग पासींनी भाजपला आपले मानले’’, असे आंबेडकरी विचारांचे विद्यार्थीनेते अमरसिंह पासवान यांचे म्हणणे. अमरसिंह यांची पत्नी अन्नू प्रसाद यादेखील विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांमधून राजकारणाशी जोडल्या गेल्या आहेत. अन्नू प्रसाद यांना समाजवादी पक्षाकडून खजनी या राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा अमरसिंह यांचा प्रयत्न अपयशी ठरला. ‘सप’ने या मतदारसंघात अन्य दलित जातीला प्रतिनिधित्व दिल्याने पती-पत्नी ‘सप’मधून बाहेर पडले आहेत. आता काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अमरसिंह काम करत आहेत. पासी आणि निषाद भाजपऐवजी काँग्रेसकडे वळले तर गोरखपूर जिल्ह्यात काँग्रेसची संघटना मजबूत होईल असे अमरसिंह यांना वाटते.

मुख्यमंत्री योगींनी बंडखोर स्थानिक उमेदवार अजयकुमार टप्पू यांना उभे केल्याने चौरी चौराची स्थिती आणखी जटिल झाली आहे. इथे आता स्थानिक विरुद्ध परके या लढाईत पासी, निषाद आणि यादव या तिन्ही समाजाची मते टप्पूंकडे वळू शकतात.