पुढील वर्षी म्हणजेच २०२२ रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाने सुरुवात केलीय. निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याआधी पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारने घेतला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने घेतलाय. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्यांच टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> …तर आम्ही पाच वर्षात उत्तर प्रदेशला पाच मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊ; नेत्यानं दिला शब्द

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचं सरकार असतानाच आंदोलन आणि धरणं आंदोलन करणाऱ्यांविरोधात राजकीय हेतूने दाखल करण्यात आलेले तसेच खोटे आरोप करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येणार असल्यांच सांगण्यात आलं आहे. सपा आणि बसपाच्या कार्यकाळात भाजपा कार्यकर्त्यांवरोधात दाखल केलेले ५००० हजारहून अधिक खटले मागे घेण्यात येणार आहेत. जुलै महिन्यापर्यंत हे सर्व खटले मागे घेण्यासाठीच्या हलचाली सुरु झाल्यात. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष राधा मोहन सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : योगीच… भाजपा नेत्यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

यासंदर्भात बोलताना राज्याचे गृहमंत्री ब्रिजेश पाठक यांनी ही सामान्य प्रक्रिया आहे. हे खटले राजकीय हेतूने किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले. या सर्व खटल्यांचा अभ्यास करुन आम्ही असे खटले मागे घेण्याचा निर्णय़ घेतलाय आणि ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. यापूर्वीही उत्तर प्रदेश सरकारने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी न्याय विभागकडून पाठिंबा मागितला होता. निवडणुकींचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना समाधानी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

नक्की वाचा >> योगींच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधील बेरोजगारांच्या संख्येत अडीच पटींने वाढ; राज्याच्या GDP मध्ये घट

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यास भाजपाने सुरुवात केलीय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पंचायत अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये भाजपा सहकारी पक्ष असणाऱ्या अपना दलसाठी जौनपुर आणि मिर्झापूरच्या जागा सोडू शकतात. केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर भाजपाने आपना दलसाठी दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याऐवजी जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपा ७३ जागा लढवणार तर अपना दल दोन जागी लढणार आहे.

नक्की वाचा >> गोरखपूर मंदिरात योगी आदित्यनाथांनी केला रुद्राभिषेक; पंडित म्हणाले, ‘यामुळे करोनाचा नाश होईल’

मंत्रीमंडळामध्ये फेरबदल करताना उत्तर प्रदेशमधील राजकीय गणिताचा विचार करुन अपना दलला केंद्रात एखादं मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. मोदी सरकारने आपल्या पहिल्या सरकारच्या कालावधीमध्ये अनुप्रिया पटेल यांना मंत्रीपद दिलं होतं. मात्र दुसऱ्या कार्यकाळात अपना दलला प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही. मंत्रीमंडळ फेरबदलामध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अपना दलला खुश करण्यासाठी मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जाणकार सांगतात.