सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचा काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला दावा  फेटाळत लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी सध्या मनिष तिवारी रिकामे असून त्यांच्याकडे काहीही काम नाही असे म्हटले.
सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी म्हटले.  दरम्यान, सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचा काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला दावा काँग्रेसने फेटाळल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारला पूर्वकल्पना न देता लष्कराच्या दोन मोठय़ा तुकडय़ा १६ जानेवारी २०१२ च्या रात्री राजधानी नवी दिल्लीच्या रोखाने मार्गक्रमणा करत असल्याबद्दलची द इंडियन एक्स्प्रेसने दिलेली बातमी दुर्दैवी असली तरी खरी होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काल केला होता. ती घटना घडली त्या काळात म्हणजे ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ दरम्यान तिवारी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री होते. तसेच संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्यही होते.
द इंडियन एक्स्प्रेसने ४ एप्रिल २०१२ च्या अंकात ‘द जॅन्युअरी (जानेवारी) नाइट रईसाना हिल वज स्पुक्ड: टू की आर्मी युनिट्स मुव्ह्ड टोवर्ड्स देल्ही विदाऊट नोटिफाईंग गव्हर्नमेंट’ या मथळ्याने बातमी दिली होती. या वृत्तात एक्स्प्रेसने म्हटले होते की, १६ जानेवारीच्या रात्री (म्हणजे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग त्यांच्या जन्मतारखेच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयात गेले त्या दिवशी) ३३ आर्मर्ड डिव्हिजनमधील हिसार येथे तैनात असलेली यांत्रिक पायदळाची एक महत्त्वाची तुकडी आणि आग्रा येथील एअरबोर्न ५० पॅरा ब्रिगेडचा (हवाई छत्रीधारी सैनिक) मोठा हिस्सा नवी दिल्लीच्या रोखाने आगेकूच करत असल्याची माहिती गुप्तहेर खात्यांनी दिली होती. मात्र इतक्या मोठय़ा लष्करी हालचालींची केंद्र सरकारला काहीच कल्पना दिलेली नव्हती. तशी ती देणे नियमांनुसार आवश्यक होते. त्यामुळे ही लष्करी उठावाची तयारी होती असे त्या बातमीतून अप्रत्यक्षरीत्या सुचवले गेले होते.