पीटीआय, होशियारपूर भाजप व रा.स्व. संघ हे देशातील संस्था बळकावत असून निवडणूक आयोग व न्यायपालिकेवर दबाव टाकत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. कुणी माझा गळा कापला, तरी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.‘मी कधीही संघाच्या कार्यालयात जाऊ शकणार नाही. तुम्ही माझा गळा कापू शकता, पण तरीही मी जाणार नाही. माझ्या कुटुंबाची काही विचारधारा आहे, विचारसरणी आहे,’ असे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने येथे आलेले राहुल म्हणाले. तुमचे चुलतभाऊ आणि भाजपचे खासदार वरुण गांधी यांच्याशी तुम्ही संपर्क साधण्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता, आमच्या विचारधारा जुळत नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. ‘मी त्याला भेटू शकतो, मिठी मारू शकतो; पण त्यांची विचारधारा स्वीकारू शकत नाही. ते अशक्य आहे,’ असे ते म्हणाले. रा.स्व. संघ व भाजपवर त्यांनी संस्थांवर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप केला. ‘सर्व संस्थांवर दबाव आहे. माध्यमे, नोकरशाही, निवडणूक आयोग यांच्यावर दबाव आहे आणि ते न्यायपालिकेवरही दबाव टाकत आहेत,’ असे राहुल यांनी नमूद केले.