विकासासाठी विकेंद्रीकरण आवश्यक आहे असे सांगत राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये लघु उद्योगांसाठी पोषक योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते वरूण गांधी यांनी त्यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी केलेले काम मी अद्याप बघितलेले नाही. मात्र, त्यांनी लघु उद्योगांसाठी उपयुक्त ठरणाऱया योजना यशस्वीपणे राबविल्याचे वरूण गांधी म्हटले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरूण गांधी यांनी राहुल गांधींच्या कामाची स्तुती केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.
राहुल गांधी यांनीही वरूण गांधीं यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. इतर लोक माझ्या कामाची स्तुती करीत असल्याचे ऐकून आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी मंगळवारी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधी हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. रायबरेलीतील जनता पुन्हा एकदा आपल्याला निवडून देईल, असा विश्वास त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना व्यक्त केला.