प्रस्तावाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मंजुरी नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडीवर सक्षम पर्याय म्हणून वसई येथे ‘मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्यसभेतील भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी बुधवारी दिली. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरून तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मोठ्या संख्येने ट्रक आणि कंटेनर ही अवजड वाहने ठाणे शहरात येतात आणि तिथून ती नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराकडे जातात. त्यामुळे ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यावर पर्याय म्हणून वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या २२,५०० चौरस मीटर मोकळ्या जागेवर तसेच, ‘इंडियन ऑइल कंपनी’च्या १३ हजार चौ. मीटर जागेवर एकत्रितपणे मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्क बांधण्याला रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय तसेच, बंदरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. पार्क बांधण्याचा संपूर्ण खर्च रेल्वे मंत्रालयाकडून केला जाणार आहे. यासंदर्भात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यासह भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिका गटनेते मनोहर डुंबरे, भाजपचे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी, उरणचे आमदार महेश बालदी आदींच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय आणि जेएनपीटी व्यवस्थापन यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करून ते अत्याधुनिक बनवण्याच्या प्रस्तावालाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. देशातील ६० रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण केले जात असून आता त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश केला जाणार असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. माथेरान-नेरळ टॉय ट्रेन फक्त ५-६ किमी धावते. ही रेल्वे नेरळपर्यंत धावली आणि त्यातून मालवाहतूकही सुरू केली तर माथेरानमधील रहिवाशांना लाभ होऊ शकेल, अशी विनंतीही रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली. कर्जत-पनवेल हा २५ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्याचीही मागणी केल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.