China Media Shared Old Visuals as Operation Sindoor : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल जनतेची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भारताने चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सवर जोरदार टीका केली आहे. ग्लोबल टाईम्सने ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात क्रॅश झालेल्या विमानांचे जुने फोटो वापरून वृत्त प्रकाशित केले होते.

बातमी देण्याआधी माहिती तपासा

प्रिय ग्लोबल टाईम्स, आम्ही शिफारस करतो की तुम्ही अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तुमच्या तथ्यांची पडताळणी करा आणि तुमच्या स्रोतांची उलटतपासणी करा”, असे चीनमधील भारतीय दूतावासाने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. “ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात अनेक पाकिस्तान समर्थक हँडल निराधार दावे पसरवत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माध्यमं स्त्रोतांची पडताळणी न करता अशी माहिती शेअर करतात, तेव्हा ते जबाबदारी आणि पत्रकारितेच्या नैतिकतेतील गंभीर त्रुटी दर्शवतात, असं दूतावासाने म्हटले आहे. सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडिओ व्हायरल होत असून केंद्र सरकारच्या फॅक्ट चेककडून या व्हिडिओंची तपासणी केली जात आहे.

राजस्थानमध्ये २०२४ मध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २९ हे विमान कोसळले होते. तसंच, २०२१ मध्ये पंजाबमध्ये आयएएफ मिग २१ लढाऊ विमान कोसळले होते. या घटनेतील व्हिडिओ पाकिस्तानातील हवाई हल्ल्यांशी जोडले जात आहेत. हेच व्हिडिओ ग्लोबल टाईम्सकडून शेअर करण्यात येत आहेत.

“या प्रकरणातील तथ्ये तुमच्या माहितीसमोर आणतो. २२ एप्रिल २०२५ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी आणि पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर एक क्रूर दहशतवादी हल्ला केला. त्यांनी एका विशिष्ट समुदायाला आणि २६ लोकांची हत्या केली, यात नेपाळचा एक नागरिकही होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता”, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. भारताने म्हटले आहे की पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूरतेने घडला होता, यामध्ये पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

“द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) नावाच्या एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा गट संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या पाकिस्तानी दहशतवादी गट, लष्कर-ए-तैयबाचा एक गट आहे. भारताने मे आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ निर्बंध समितीच्या देखरेख पथकाला दिलेल्या अर्धवार्षिक अहवालात टीआरएफबद्दल माहिती दिली होती, ज्यामुळे पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांसाठी कव्हर म्हणून त्याची भूमिका समोर आली होती”, असे दूतावासाने म्हटले आहे.