पाटणा : बिहारच्या १६ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने एकूण ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. विजांच्या कडकटासह अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृत्युमखी पडलेल्यांच्या आप्तांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. पीक व घरांच्या नुकसानीचे तपशीलवार विश्लेषण करून, झळ पोहोचलेल्या कुटुंबांना आणखी मदत पुरवण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आले. १९ मे रोजी दुपारपासून बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बिहारमध्ये विजांसह गारपीट, पाऊस झाल्याने अनेकांना प्राणांस मुकावे लागले. मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनातर्फे येथे मदतकार्य सुरू आहे. आगामी दोन दिवस येथे विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार असून, अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ इशारा देण्यात आला आहे.