बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व धोक्यात आले आहे. मल्ल्या यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी राज्यसभेच्या शिस्तपालन समितीने एका आठवड्याची मुदत दिली असून, मल्ल्या यांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यास त्यांची खासदारकी रद्द केली जाऊ शकते.
राज्यसभेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष करण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सोमवारी बैठक झाली. बैठकीत विजय मल्ल्या यांच्या सदस्यत्वाची चर्चा करण्यात आली. मल्ल्या यांचे सदस्यत्व रद्द करण्यास बैठकीत एकमत झाले. मात्र, मल्ल्या यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी, असेही बैठकीत ठरले. त्यासाठी त्यांना एका आठवड्याची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मल्ल्या यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे. पण त्याआधीच त्यांची पदावरून गच्छंती होण्याची चिन्हे आहेत.