Vinay Narwal नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच लग्न सात दिवसांपूर्वी हिमांशीसह झालं होतं. आज त्यांच्या विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं.
विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना काय म्हणाली त्यांची पत्नी?
“विनयच्या आत्म्याला शांती मिळो.. विनय तुझी आठवण रोज येईल, रोज येईल” असं म्हणत विनयच्या पत्नीने तिच्या अश्रूंना वाट करुन दिली. त्यानंतर ती पार्थिवाच्या शेजारी उभी राहून जय हिंद म्हणाली. कुठल्याही माणसाचं हृदय द्रवेल अशीच ही दृष्यं आहेत. अवघ्या सात दिवसांची साथ या दोघांना लाभली. कारण मधुचंद्रासाठी विनय आणि हिमांशी काश्मीरला आले होते. दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हिमांशी त्यांच्या मृतदेहाजवळ बसून राहिली होती. तिचा मूक आक्रोशच तिला या सगळ्या घटनेचा किती धक्का बसला आहे हे सांगत होता. आज विनय नरवाल यांच्या पार्थिवाला अखेरचं नमन करताना हिमांशीच्या अश्रूंना पुन्हा एकदा वाट मिळाली.

२२ एप्रिलला नेमकं काय घडलं?
विनय नरवाल हे त्यांची पत्नी हिमांशी यांच्यासह मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. हिमांशी यांनी सांगितलं की मी माझ्या पतीसह भेळ खात होते. त्यावेळी एक माणूस आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का? त्यावर विनय नाही म्हणाला. ज्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या. विनय नरवाल यांनी लग्नासाठी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती. १६ एप्रिलला विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं. त्यानंतर २० एप्रिलला विमानाने हिमांशी आणि विनय काश्मीरला आले होते. २२ एप्रिल रोजी विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं.
विनय नरवाल लग्नाच्या सुट्टीवर होते
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी २६ वर्षीय विनय नरवाल यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. कोची या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग होतं. १६ एप्रिलला त्यांचं लग्न झालं. त्यानंतर १९ एप्रिलला रिसेप्शन पार पडलं. यानंतर विनय नरवाल सुट्टीवर आले होते. काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी विनय नरवाल यांनी नौदलात नोकरी स्वीकारली. त्यांचं पोस्टिंग कोची मध्ये होतं. विनय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखात आहेत. त्यांच्या इतर नातेवाईकांनी, मित्रांनी तसंच शेजाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. आज त्यांच्या पार्थिवाला नमन करताना त्यांची पत्नी हिमांशीचा कंठ दाटून आला आहे. कॅमेरात ही मन गदगदून येणारी दृश्यं कैद झाली आहेत.