घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने भारतीय प्रादेशिक भाषांच्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे, असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी घुमान येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. तावडे यांनी घुमान संमेलन नगरीतील प्रसार माध्यम केंद्राला सकाळी भेट दिली. त्यांच्यासमवेत स्वागताध्यक्ष भारत देसलडा व संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे होते. मराठी भाषेचे साहित्य संमेलन होते, त्याचप्रमाणे भारतीय प्रादेशिक भाषांमधील साहित्याचे साहित्य संमेलन होण्याची गरज आहे. असे साहित्य संमेलन आजवर झालेले नाही. घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आहे. आता भारतीय प्रादेशिक भाषांचे साहित्य संमेलन झाले पाहिजे. त्याची पताका मी संमेलनाध्यक्ष मोरे यांच्याकडे देतो, असेही तावडे यांनी सांगितले.