महेश सरलष्कर, लोकसत्ता हैदराबाद : उदयपूर, अमरावतीसारख्या शहरांमध्ये होत असलेल्या हिंसेला काँग्रेसचे तुष्टीकरण जबाबदार आहे. जातिवाद, प्रांतवाद, तुष्टीकरण आणि काँग्रेस व प्रादेशिक पक्षांची घराणेशाही संपुष्टात आली तर देशातील हिंसाचार संपुष्टात येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय प्रस्ताव मांडताना केला. प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भात अपमानास्पद व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रवक्ता नूपुर शर्मा यांचे भाजपने निलंबन केले आहे. या प्रकरणाचे हिंसक पडसाद अमरावती व उदयपूर या शहरांमध्ये उमटले आहेत. या मुद्दय़ावर राजकीय प्रस्तावात थेट भाष्य करण्यात आलेले नाही, मात्र देशातील हिंसाचाराला काँग्रेसचे कित्येक वर्षांचे अनुनयाचे राजकारण कारणीभूत असल्याची भूमिका मांडण्यात आली. जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण या काँग्रेसच्या तीन नासुरांपासून देश मुक्त झाला तर विकासाचे राजकारण होऊ शकेल. आता सुशासन व विकास या मुद्दय़ांवर देशाचे राजकारण केले जात आहे. केंद्रामध्ये आठ वर्षांपूर्वी मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. त्यामागे विकासाचे राजकारण हाच एकमेव मुद्दा होता, असे मत शहा यांनी बैठकीत मांडल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी पत्रकारांना दिली. देशातील हिंसेचे राजकारण संपुष्टात आले पाहिजे, असाही मुद्दा शहा यांनी मांडला. मात्र, धर्माच्या आधारावर झालेल्या हिंसाचाराच्या घटना कशा थांबवायच्या याचे थेट उत्तर मात्र राजकीय प्रस्तावात दिलेले नाही. यासंदर्भात हिमंत बिस्वा शर्मा यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनीही उत्तर दिले नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आदी संवेदनशील धोरणांच्या अंमलबजावणीबाबतही राजकीय प्रस्तावात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ‘अखेर मोदींना न्याय!’ गुजरातमधील दंगलीसंदर्भात एसआयटीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेले निर्दोषत्व सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत विरोधातील याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक असल्याचे मत शहा यांनी या मुद्दय़ावरील राष्ट्रीय कार्यकारिणीतील चर्चेत मांडले. विरोधी विचारसरणीचे पक्ष, पत्रकार व एनजीओ या त्रिकुटांनी मोदींवर राळ उठवली होती. मोदींना एकोणीस वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मोदी यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. अमृतमंथनात शंकराने जसे विष प्राशन केले, तसे मोदींनी सर्व अपमान व आरोप सहन केले. आता त्यांच्यावर एकही डाग राहिलेला नाही, असे शहा बैठकीत म्हणाल्याची माहिती शर्मा यांनी दिली. ‘विरोधक नकारात्मक’ काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकांवर या प्रस्तावात टीका करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीसाठी संघर्ष केला जात आहे. विरोधक विखुरलेले असून ते सातत्याने मोदी सरकार व भाजपच्या धोरणांवर टीका करत आहेत. सर्जिकल स्ट्राइक, जीएसटी, आयुष्यमान भारत, लसीकरण, नागरिकत्व कायदा, तिहेरी तलाक, राम मंदिर अगदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवालाही विरोधी पक्षांनी विरोधच केला आहे, असा मुद्दा शहा यांनी मांडला. देशातील मोदी सरकार मात्र विविध समाजघटकांच्या विकासाचे काम करत आहे. आठ वर्षांत भाजपला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्याची दोनदा संधी मिळाली. गेल्या वेळी दलित समाजातील उमेदवार उभा केला. या वेळी आदिवासी समाजातील महिलेला भाजपने उमेदवारी दिली आहे, असा युक्तिवाद शहा यांनी बैठकीत केला. ‘४० वर्षे भाजपचेच युग’ मोदींच्या नेतृत्वाखाली आठ वर्षे देशात भाजपची सत्ता असून पुढील तीस ते चाळीस वर्षे देशात भाजपचेच युग असेल, असाही दावा बैठकीत करण्यात आला. उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली तरी, दक्षिण व पूर्व राज्यांमध्ये पक्षविस्ताराचे ध्येय ठेवण्यात आले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू तसेच पश्चिम बंगाल आणि