क्रिकेटच्या चाहत्यांना देशातून निघून जाण्याचा सल्ला देण्यावरुन सोशल मीडियामध्ये ट्रोल झालेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन तोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे. ट्विटर कोहलीने लिहीले की, मला वाटतं हे ट्रोलिंग माझ्यासाठी नाही तसेच याकडे विशेष लक्ष द्यावेसे मला वाटत नाही. माझा सल्ला केवळ त्या लोकांसाठी होता ज्यांनी भारतीय फलंदाजांसाठी नकारात्मक टिपण्या केल्या होत्या. विराट म्हणतो की, मला देखील बोलण्याचा आणि आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका दीवाळी सणाचा आनंद घ्या, माझ्याकडून सर्वांना प्रेम आणि शांततेच्या शुभेच्छा. सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो क्रिकेट चाहत्यांना देश सोडून जाण्याचा सल्ला देत आहे. मात्र, या व्हिडीओत विराट मोबाईलवर एक मेसेज वाचताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहीले की, विराटच्या फलंदाजीत विशेष काही नाही. मला अशा भारतीयांपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळताना पहायला जास्त आवडते. अशी खोचक कमेंट लिहिणाऱ्याला उत्तर देताना विराटने लिहिले की, जर आपल्याला भारतीय फलंदाजांना खेळताना पाहणे आवडत नसेल तर मला नाही वाटत की तुम्ही या देशात रहावे. भारताबाहेर जाऊन इतर कोठेही जाऊन तुम्ही निवांत रहा. आमच्या देशात तुम्ही का राहता आणि दुसऱ्या देशांवर प्रेम करता? मी तुम्हाला आवडत नाही यावर माझी काहीही हरकत नाही. मला वाटत नाही की आपण आमच्या देशात रहायला हवे आणि दुसऱ्यांसारखा विचार करायला हवा. त्यामुळे आपण आपली प्राथमिकता निश्चत करायला हवी. कोहलीने दिलेले हे कडवे उत्तर काही चाहत्यांना आवडले नव्हते. त्यामुळे त्यांनी विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. ५ नोव्हेंबरला आपला ३०वा वाढदिवस साजरा केल्यानंतर विराट कोहली सध्या आराम करीत आहे.