शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यासोबतच त्यांनी आपलं नावदेखील बदललं आहे. वसीम रिझवी यांचं नवं नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी असणार आहे.

इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर बोलताना जितेंद्र नारायण सिंह त्यागी (वसीम रिझवी) यांनी म्हटलं की, “येथे धर्मांतराचा काही मुद्दा नाही, मला इस्लाममधून काढण्यात आलं असताना कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा हा माझा हक्क आणि इच्छा आहे. सनातन जगातील सर्वात पहिला धर्म असून जितक्या चांगल्या गोष्टी येथे आहेत तितक्या कोणत्या धर्मात नाहीत. जुम्माला नमाज पठण केल्यानंतर शिर कापण्यासाठी फतवे काढले जात असताना अशा परिस्थिती कोणी आम्हाला मुसलमान म्हणणं याच्याने आम्हालाच लाज वाटते”.

“…म्हणून माझं पार्थिव दफन न करता त्याला हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करा”; वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांचं मृत्यूपत्र

सोमवारी नरसिंहानंद यांनी वसीम रिझवी यांना हिंदू धर्मात सहभागी करुन घेतलं. यानंतर जितेंद्र त्यागी म्हणजेच वसीम रिझवी मंदिरात दिसले. येथे त्यांच्या गळ्यात भगवा कपडा दिसत होता. तसंच हात जोडून देवाचा पूजा करत होते.

वसीम रिझवी नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे वादात अडकले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी केलेली वक्तव्य इस्लाम तसंच मुस्लिमविरोधी असल्याची टीका करण्यात आली. मुस्लिमांमध्ये त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष होता.

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच मोदींच्या लॉकडाउनला विरोध : वसीम रिझवी

वसीम रिझवी यांनी इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या लिखाणावरुन खूप टीका झाली आहे. इतकंच नाही तर वसीम रिझवी यांनी इस्लाममध्ये सुधार करण्याची मागणीदेखील केली होती. कुराणमधील २६ आयती हटवल्या जाव्यात यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही केली होती.

कुराणमधून आयाती वगळण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड!

या सर्व घडामोडींदरम्यान अखेर ६ डिसेंबरला वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्विकारला आणि नावदेखील बदललं.

दरम्यान अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी वसीम रिझवी यांचं स्वागत केलं असून त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. वसीम रिझवी आता हिंदू झाले असून त्यांच्याविरोधात फतवा काढण्याची हिंमत कोणी करु नये असं सांगताना त्यांनी केंद्राकडे त्यांना योग्य सुरक्षा देण्याची मागणी केली. आहे.