नोकरी देण्याच्या आमिषाने भारतीयांना म्यानमारमध्ये बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आंतरराष्ट्रीय टोळीने केरळातील ३० लोकांना म्यानमारच्या म्यावाड्डी येथे एका संकुलात बंधक बनवले आहे. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारीसारखी काम करून घेतली जात आहे. काम करण्यास नकार दिला तर, विजेचे झटक्यांनी त्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळतं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

म्यानमारमधील म्यावाड्डी येथे ‘अब्ज-डॉलर कसिनो आणि पर्यटन संकुल’ आहे. या संकुलात भारतीयांना बंधक बनवून ठेवण्यात आलं आहे. येथून सुटलेल्या केरळच्या नागरिकाने म्हटलं की, येथे काही लोक शसस्त्र हत्यारांसह परिपूर्ण आहेत. बंधिस्त केलेल्या लोकांकडून १६ तास काम करुन घेतले जाते. त्यांना खाण्यास काही दिले जात नसून, गोळ्या घातल्या जातील या भितीने मानसिक दबावाखाली ते आहेत. त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. त्यांना फोन वापरण्यासाठी कठोर निर्बंध आहेत.

या बंधिस्तांकडून दररोज डेटा चोरीसारखी कामे करुन घेतली जातात. यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोकांना लक्ष केले जाते. काम करण्यास मनाई केली तर, त्यांना मारहाण आणि उपाशी ठेवण्यासारखे प्रकार घडत असल्याचं दुसऱ्या एका नागरिकाने सांगितलं.

प्रकरण काय?

थायलंडमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती निघाली होती. त्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही केरळचे लोक बँकॉकला गेले होते. बँकॉकमधील विमानतळावर आल्यानंतर या लोकांना बंदुकीच्या जोरावर म्यानमारमध्ये नेले. तेथे त्यांना बंधक बनवण्यात आलं. त्यानंतर अपहरकर्त्यांनी त्यांनी कामाच्या नियमांबद्दल माहिती दिली. जर, पळून जाण्याचा प्रयत्न केला तुमचे मृतदेह पासपोर्टसह थायलंडच्या सीमेवर टाकण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली.