वस्तू आणि सेवाकरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही भाजपला भारतावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही. भारतातील लघू आणि मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडू देणार नाही, असेही ते म्हणालेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि २४ राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहटी येथे आज (शुक्रवारी) जीएसटी परिषदेची बैठक झाली. जीएसटी करप्रणालीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला. या बैठकीत १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. असंघटित कामगार आणि लाखो तरुणांचे रोजगार आम्ही धोक्यात येऊ देणार नाही. आम्ही ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही, असा इशाराच राहुल गांधींनी दिला. राहुल गांधी यांनी काही सूचनाही केल्या आहेत. ‘देशात साधी आणि सोपी कररचना असलेला जीएसटी लागू करावा, बोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करुन जनतेला काय हवे ते जाणून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील जीएसटीवरुन भाजपवर टीका केली आहे. जीएसटीचा ज्या व्यापारी, ग्राहक आणि अन्य घटकांना फटका बसला आहे. त्यांना २०१९ मध्ये आपले सरकार केंद्रात आल्यावर दिलासा मिळेल असे बदल आम्ही जीएसटी करप्रणालीत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यापूर्वी दिले होते. महागाई कमी करा, रोजगार द्या अन्यथा सिंहासन सोडा, असेही त्यांनी म्हटले होते.