amil Nadu, Kerala, West Bengal Assembly Election Results Updates : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील निवडणुकांचा निकाल सोमवारी लागला. या निकालांमध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला. या दोन्ही राज्यांत सत्ताधारी पक्षांचा सुपडा साफ झाला असून दोन्ही मुख्यमंत्रीही आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आहेत. तर, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये सत्ताधारी पक्षानेच गड राखला असून केरळमध्ये काँग्रेसने क्रांती केली आहे.
निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर देशभर जल्लोष अन् आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विजयी मिरवणुकांची तयारी सुरू असतानाच टीका-टिप्पण्यांनाही उत आलाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेपर्यंत या राज्यांमध्ये अवघ्या देशाचं लक्ष लागून राहणार आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी स्पष्ट बहुमत मिळाले असून तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. शिवाय युती सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिवर्तन
पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिवर्तन झाले आहे. तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश आले असून भाजपेच सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार मतांच्या फरकांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. भाजपाला येथे बहुमत मिळाले असून त्यांच्या एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाने २०६ जागांवर विजय मिळवला असून तृणमूलने ८० जागा राखल्या आहेत. तर एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे.
पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी निवडणूक झाली. फक्त फाल्टा या विधानसभा मतदारसंघात मतदान रद्द करण्यात आले होते. त्यामुळे बहुमताचा आकडा १४८ आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ७१ वर्षीय ममता बॅनर्जी, सलग चौथ्या अभूतपूर्व कार्यकाळासाठी प्रयत्नशील होत्या, तर एक्झिट पोल्सनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळवण्यास यश मिळणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलं होतं. तसंच, भाजपासाठी ही निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र, भाजपामुळे त्यांच्यावर राजकीय नामुष्की ओढावली आहे.
ममता बॅनर्जींचा पराभव
भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांना ७३ हजार ९१७ मते मिळाली असून ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मते मिळाली आहेत. या दोघांमध्ये १५ हजार १०५ मतांचा फरक आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे.
विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
“अत्यंत नम्रता आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने मी पश्चिम बंगालच्या ‘जनता-जनार्दना’समोर नतमस्तक होतो. आजचा हा ऐतिहासिक जनादेश केवळ भारतीय जनता पक्षाचा विजय नाही; तर तो प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक सनातनी व्यक्तीचा विजय आहे, ज्यांनी परम पूजनीय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी घडवलेल्या हिंदू मातृभूमीत ‘सोनार बांगला’ आणि ‘कमळ’ फुलण्याचे स्वप्न पाहिले होते. पश्चिम बंगालच्या जनतेने आपला कौल दिला असून त्यांच्या आवाजाने आशेची एक नवी पहाट उजाडली आहे. माझी मनःपूर्वक कृतज्ञता नंदीग्राम आणि भवानीपूरमधील शूर आणि कणखर जनतेचा मी सदैव ऋणी राहीन”, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.
“प्रतिनिधी म्हणून माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे आणि तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याचे वचन देतो. हा अभूतपूर्व विजय आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या अथक मार्गदर्शनाशिवाय शक्य नव्हता. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने प्रत्येक बंगाली घराघरात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. गृहमंत्री अमित शाह, तुमची प्रबळ इच्छाशक्ती, धोरणात्मक कौशल्य आणि सततचे प्रोत्साहन आमच्या या संघर्षाचा कणा राहिले आहे. मला भवानीपूरमधून निवडणूक लढवण्याची सूचना दिल्याबद्दल धन्यवाद”, असंही ते म्हणाले.
West Bengal Election Results 2026 LIVE TMC vs BJP Party-wise Seat Tally : पश्चिम बंगाल निवडणूक निकालाचे अपडेट्स जाणून घ्या
‘लोकांचं कल्याण हेच आमचं ध्येय’, थलपती विजयने मानले मोदींचे आभार; केंद्र सरकारकडे व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा मोठा करीश्मा पाहायला मिळाला. टीव्हीके पक्षाने तामिळनाडूत जोरदार मुसंडी मारली. विधानसभा निवडणुकीत ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी थलपती विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या तामिळनाडूत मोठ्या घडामोडी सुरू असून थलपती विजय हे लवकरच सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
"एवढं खोटं बोलताना त्यांना लाज वाटत नाही का? - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक
पश्चिम बंगालच्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"त्यांचा पराभव झाला यात एवढं मोठं काय आहे? ममता बॅनर्जी यांनी असं कुठे लिहून घेतलं होतं का की त्या कधीच निवडणूक हरणार नाहीत? भवानीपूरमध्ये राहून फक्त मुस्लिमांबद्दल बोलायचं... त्यांना साक्षात 'आई भवानी'चा शाप मिळाला आहे. मुस्लिम बहुल भागांत हिंदूंना पुन्हा एकदा मतदान करू दिलं गेलं नाही; हिंदूंनी याच गोष्टीचा आपल्या मतांद्वारे बदला घेतला आणि त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं."
"एवढं खोटं बोलताना त्यांना लाज वाटत नाही का? त्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना 'झेड प्लस' (Z+) दर्जाची सुरक्षा आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय सुरक्षा दल त्यांना मारहाण कशी काय करू शकतं? आता त्यांचे हे असले बहाणे चालणार नाहीत..." अशा स्पष्ट शब्दात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक यांनी टीका केली.
"तमिळनाडू निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आहेत - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या
"तमिळनाडू निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आहेत. मतदारांना बदल हवा होता आणि त्यांनी जोसेफ विजय यांची निवड केली," असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
"या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोग (CEC) हा मुख्य 'व्हिलन' ठरला आहे. त्यांनी लोकांचे लोकशाही हक्क आणि ईव्हीएमच्या (EVM) विश्वासार्हतेवर घाला घातला आहे. मतदान संपल्यानंतरही ईव्हीएममध्ये ८० ते ९५ टक्के चार्जिंग कसं काय दाखवू शकतं? हे शक्यच कसं आहे? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासूनच पोलिसांनी विनाकारण धरपकड सुरू केली. ठिकठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. पोलीस निरीक्षक (IC), प्रभारी अधिकारी (OC) यांच्यापासून ते जिल्हाधिकारी (DM) आणि आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या बदल्या करण्यात आल्या. अगदी WBCS आणि WBPS अधिकाऱ्यांनाही सोडलं नाही. आमच्या मते, या सर्व नेमणुका राजकीय हेतूने प्रेरित होत्या. भारतीय जनता पक्षाने थेट निवडणूक आयोगासोबत मिळून हा खेळ खेळला आहे. एक प्रकारे भाजप आणि निवडणूक आयोगामध्ये 'सेटिंग' झाली होती, असं आपण म्हणू शकतो." असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"ममता बॅनर्जींनी मुस्लिमांचा फक्त वापर करून घेतला", ओवैसी यांची टीका
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "पश्चिम बंगालबाहेर ममता बॅनर्जी यांची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष अशी जी प्रतिमा आहे, ती चुकीची आहे. त्यांनी मुस्लिमांना नागरिक म्हणून वागणूक न देता, केवळ मतपेढी म्हणून त्यांचा वापर केला आहे. त्यांच्या प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार झाला. एसआयआर (SIR) हा देखील एक घटक आहे, परंतु जर टीएमसीने मुस्लिमांना केवळ मतपेढी न मानता नागरिक म्हणून वागणूक दिली असती, तर अधिक विकास झाला असता.
"द्रविड पक्षांकडे १२० पेक्षा जास्त जागा, आम्हाला जनतेने नाकारलेले नाही", AIADMK च्या नेत्याची प्रतिक्रिया
अण्णाद्रमुक (AIADMK) नेते के. पंडियाराजन म्हणाले, "दोन्ही द्रविड पक्षांकडे (अण्णाद्रमुक आणि द्रमुक) अजूनही १२० पेक्षा जास्त जागा आहेत हे विसरू नका. मला नाही वाटत की द्रविड पक्षांना नाकारले गेले आहे. द्रमुक (DMK) विरुद्ध सत्ताविरोधी लाट होती आणि त्याचा फायदा टीव्हीके (TVK) पक्षाला मिळाला आहे. मला खात्री आहे की आमच्या पक्षात पुन्हा उभारी घेण्याची पुरेशी क्षमता आहे. विजय तरुणांची भाषा बोलू शकले... मला अण्णाद्रमुक लवकरच पुनरागमन करताना दिसत आहे. ६ महिन्यांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्हाला मोठा फरक पाहायला मिळेल."
टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती
टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती झाली असल्याचे टाईम्स नाऊच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये ९ मे रोजी शपथविधी? मुख्यमंत्री कोण होणार? सुकांत मजुमदार यांनी स्पष्टच सांगितलं!
शपथविधी सोहळ्याबाबत केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणले "सध्या ९ मे बाबत अजूनही चर्चा सुरू आहे. पक्षाकडून अधिकृत सूचना येऊ द्या..." भाजपच्या मुख्यमंत्री निवडीवर ते म्हणले, "भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार ठरवले जाते आणि त्याच पद्धतीनुसार ते ठरवले जाईल."
तामिळनाडू निवडणुकीत जिंकलेल्या त्रिची (पूर्व) विधानसभा जागेचा विजय राजीनामा देण्याची शक्यता आहे. विजय आपली पेरांबूर जागा कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
TMCच्या पराभवावर जल्लोष करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी संतापले; भाजपाच्या विजयाला म्हटलं 'जनादेशाची चोरी'
भाजपाने बंगालमध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसची (TMC) चेष्टा करणाऱ्या किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
"बंगाल फक्त जमिनीचा तुकडा नसून...", हार्दिक पटेलच्या पोस्टने वेधलं लक्ष
बंगाल फक्त जमिनीचा तुकडा नसून एक लाईट हाऊस आहे, असं ट्वीट पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे.
"लोकांच्या भल्यासाठी काम करत राहा", रितेश देशमुखने केले विजय यांचे अभिनंदन
निकाल लागला आहे !! विजय यांचे या अविश्वसनीय आणि ऐतिहासिक विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. तुमच्या पाठीशी शक्ती राहो, तुम्ही लोकांच्या भल्यासाठी अविरतपणे काम करत राहा, अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुख याने दिली आहे.
चारवेळा आमदार राहिलेल्या मंत्र्याचा फक्त एका मताने पराभव; तमिळनाडूत TVK च्या उमेदवाराचा ऐतिहासिक विजय
लोकशाहीत एका मताची किंमत काय असते, याचा प्रत्यय तमिळनाडूच्या तिरुपत्तूर मतदारसंघात आला आहे. स्टॅलिन सरकारमधील दिग्गज मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा अभिनेता विजयच्या 'टीव्हीके' पक्षाच्या उमेदवाराने अवघ्या १ मताने पराभव केला.
LIVE : 'आम्ही पुन्हा जिंकू'; स्टॅलिन यांनी मतदारांचे मानले आभार, पराभवानंतर डीएमकेच्या पुनरागमनाचे दिले संकेत
स्टॅलिन यांची सोशल मीडिया पोस्ट
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) च्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या तामिळनाडूतील सर्व जनतेचे मी मनापासून आणि प्रामाणिक आभार मानतो. तुमचे प्रत्येक मत मी विश्वासाचे एक अमूल्य प्रतीक मानतो.
आतापर्यंत प्राप्त झालेल्या मतमोजणीनुसार, द्रमुक आघाडीला १ कोटी ५४ लाख ८२ हजार ७८२ मते मिळाली आहेत. मी या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. ज्या पक्षाने अधिक मतदारसंघांत विजय मिळवला आहे, त्यांना आमच्यापेक्षा केवळ १७.४३ लाख मते जास्त मिळाली आहेत. आमच्यातील आणि त्यांच्यातील मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ ३.५२ टक्के आहे. माझ्या मते, तामिळनाडूच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो खूप प्रबळ आहे.
ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्यांच्याकडे थेट जाऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचे कर्तव्य आम्ही नेहमीच पार पाडले आहे. त्या अनुषंगाने, मी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांना विनंती करतो की, त्यांनी त्वरित आपल्या मतदारांना भेटावे आणि त्यांचे आभार मानावेत. लोकशाहीत जनताच वंदनीय आहे. त्यांच्यासाठीच आपण पक्ष चालवतो आणि त्यांच्यासाठीच आपण राजकारणात आहोत. म्हणून, मी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की त्यांनी वैयक्तिकरित्या जाऊन सर्व लोकांचे आभार मानावेत.
द्रविड मुन्नेत्र कळघम सहा वेळा सत्तेत राहिला आहे. असा कोणताही विजय नाही जो आम्ही पाहिला नाही आणि असा कोणताही पराभव नाही ज्याचा आम्ही सामना केला नाही. राजकीय सार्वजनिक जीवनात, आपली विचारधारा जपण्याच्या प्रवासात, आपण नेहमी एकाच गोष्टीबद्दल सावध असतो ती म्हणजे आपल्या विचारधारेचा पराभव होऊ नये. विजय असो वा पराभव, जे दोन्हीकडे समान दृष्टीने पाहतात आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवतात, तेच या पक्षाचे खरे सोबती आहेत.
म्हणूनच, जेव्हा जेव्हा मी महत्त्वाच्या परिषदांमध्ये आणि जाहीर सभांमध्ये बोलतो, तेव्हा मी नेहमी तामिळनाडूतील सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करून सुरुवात करतो. तुम्ही या चळवळीचे रक्त आणि मुळे आहात. तुमच्यापैकी अनेक जण मला सांत्वनाचे संदेश पाठवत आहेत. तुमच्यामुळेच घडलेल्या आणि तुमच्या ताकदीतून ताकद मिळालेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत कोणती काळजी आहे?
आपण सर्वजण आपले नेते करुणानिधी यांच्यावरील प्रेमाने बांधलेले सहकारी आहोत, जे प्रेम जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याच भावनेने आपण आपला प्रवास सुरू ठेवू. १.५४ कोटी मतांचे हे पीक तुमच्या मेहनतीचे फळ आहे. तुमच्या कष्टाची परतफेड मी कशी करू शकतो? 'मुख्य कार्यकर्ता' या भावनेतून आपण आपला प्रवास सुरूच ठेवू. जर आपण सत्ताधारी पक्ष असतो, तर आपण लोकांसाठी योजना आखल्या असत्या. आता आपण विरोधी पक्ष आहोत, तर आपण लोकांच्या मागण्यांसाठी लढू. त्या दृष्टीने, आता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपण लोकांसाठीचे राजकारण सुरूच ठेवू.
वडील पेरियार, महान विद्वान अण्णा आणि तमिळ वंशाचे नेते करुणानिधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून, आपण शंभर वर्ष जुन्या महान द्रविड चळवळीच्या धोरणांची अंमलबजावणी करत जात, भाषा आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचा प्रवास सुरू ठेवू. या प्रवासात मी कोणालाही मागे सोडणार नाही.
आपण पुन्हा जिंकू!
https://twitter.com/mkstalin/status/2051533696570986819?s=20
"मतमोजणी केंद्रांमध्ये गुंडगिरी, मलाही मारहाण झाली", ममता बॅनर्जींचा फोन कॉल व्हायरल
BJP West Bengal Victory Swearing-in Date Intent: बंगालमध्ये 'पोचिशे बोईशाख'ला होणार नव्या सरकारचा शपथविधी? ‘पोचिशे बोईशाख’ म्हणजे नेमके काय?
LIVE : ऐतिहासिक विजयानंतर मोदींच्या खास पारंपरिक बंगाली पोशाखाने वेधले लक्ष
पश्चिम बंगालच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या खास पारंपरिक बंगाली पोशाखाने लक्ष वेधून घेतलं होतं.
"मी नंदिग्राममधील हिंदू लोकांसाठी काम करणार", निवडून येताच सुवेंदू अधिकारी यांची बॅनर्जींवर टीका
नंदिग्राममधील मुस्लिम जनतेने टीएमसीला मतदान केलं. तर, हिंदू लोकांनी मला मतदान केलंय. मी नंदिग्रामच्या हिंदू लोकांसाठी काम करेन. पुढील २४ तासांत टीएमसी संपणार आहे.ममता बॅनर्जी यांचं राजकारण संपलं आहे - सुवेंदू अधिकारी
ममता बॅनर्जींना चारली धूळ, दोन मतदारसंघात दणदणीत विजय; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक दिग्गज नाव असून त्यांनी दोन मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय होण्यामागे सुवेंदू अधिकारी यांचं मोठं श्रेय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारी नेमके कोण? त्यांचा राजकीय प्रवास काय आहे? हे जाणून घ्या.
Live Updates : केरळमध्ये विजय मिळाल्यानंतर राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार
"केरळमधील माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरोखरच निर्णायक कौल दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. युडीएफच्या (UDF) प्रत्येक नेत्याचे आणि कार्यकर्त्याचे त्यांनी दिलेल्या चिवट आणि सुव्यवस्थित लढतीबद्दल अभिनंदन. मी आधी म्हटल्याप्रमाणे, केरळकडे प्रतिभा आहे, केरळकडे क्षमता आहे आणि आता केरळकडे ही दोन्ही क्षेत्रे विकसित करण्याची दृष्टी असलेले युडीएफ सरकार आहे. मी माझ्या केरळमधील कुटुंबाला लवकरच भेटण्यास उत्सुक आहे", अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.
भयमुक्त पश्चिम बंगालचा आता विकासयुक्त प्रवास!
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर सोमवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन झाले असून बंगालच्या जनतेचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल भयमुक्त झाला असून तो ‘विकासयुक्त’ होईल, अशी ग्वाही दिली.
प्रादेशिक प्रस्थापितांचे पानिपत; मोदी-शहांची निवडणूकनीती पुन्हा यशस्वी, तृणमूल, द्रमुकच्या पाडावामुळे ‘इंडिया’ संकटात
राज्याराज्यांत भगवा फडकवत निघालेल्या भाजपच्या विजयरथाने सोमवारी पश्चिम बंगालही पादाक्रांत केले. केंद्रातील २०१४च्या सत्तांतरानंतरही बंगाली अस्मितेच्या बळानिशी भाजपचा प्रतिकार करणाऱ्या ममता बॅनर्जींना राज्यातल्या जनतेनेच नाकारले तर, तमिळनाडूत द्रविडी राजकारणाभोवती ‘सत्ताखुर्ची’चा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांना पछाडून अभिनेता विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ने (टीव्हीके) नवा इतिहास रचला. केरळमध्ये डाव्यांना पदच्युत करत काँग्रेसने दक्षिणेतील आपले अस्तित्व बळकट केले. या तीन राज्यांत परिवर्तन घडत असताना आसाम आणि पुद्दुचेरीत मात्र सत्ताधीशांनीच सरशी साधली.
पाच राज्यांचा निकाल: बंगालमध्ये 'कमळ' फुललं, तामिळनाडूत विजयचा धमाका; पाहा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव, भाजपाचे सुवेंदू अधिकारी विजयी; पराभवाची कारणे काय?
"सत्यमेव जयते!", स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत
कोलकातातील आर.जी.कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या आईचा विजय झाला आहे. या विजयानंतर भाजपाच्या नेत्या स्मती इराणी यांनी पोस्ट करून सत्यमेव जयते म्हटलं आहे.
टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बंगालमधील भाजपचा विजय 'अनैतिक' आहे. मी प्रति-जनादेश मागणार; टीएमसी पुन्हा उभारी घेईल.
https://twitter.com/PTI_News/status/2051306594517082344?s=20
"एका अराजकतावादी शासकाचे भवितव्य ...", पश्चिम बंगालच्या विजयानंतर अमित शाहांची पोस्ट
भवानीपूरच्या जनतेचे कौतुक. त्यांच्या निकालाने एका अराजकतावादी शासकाचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट केले आहे - अमित शाह</p>
https://twitter.com/AmitShah/status/2051339868970865052?s=20
"आशेची एक नवी पहाट उजाडली", विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांची सोशल पोस्ट
अत्यंत नम्रता आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने मी पश्चिम बंगालच्या ‘जनता-जनार्दना’समोर नतमस्तक होतो. आजचा हा ऐतिहासिक जनादेश केवळ भारतीय जनता पक्षाचा विजय नाही; तर तो प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक सनातनी व्यक्तीचा विजय आहे, ज्यांनी परम पूजनीय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी घडवलेल्या हिंदू मातृभूमीत 'सोनार बांगला' आणि 'कमळ' फुलण्याचे स्वप्न पाहिले होते. पश्चिम बंगालच्या जनतेने आपला कौल दिला असून त्यांच्या आवाजाने आशेची एक नवी पहाट उजाडली आहे. माझी मनःपूर्वक कृतज्ञता नंदीग्राम आणि भवानीपूरमधील शूर आणि कणखर जनतेचा मी सदैव ऋणी राहीन. या दोन्ही मतदारसंघांतील माझ्या भगिनी आणि बांधवांनो, माझ्यावर अढळ विश्वास दाखवून आपला प्रतिनिधी म्हणून माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे आणि तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याचे वचन देतो. हा अभूतपूर्व विजय आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या अथक मार्गदर्शनाशिवाय शक्य नव्हता. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने प्रत्येक बंगाली घराघरात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. गृहमंत्री अमित शाह, तुमची प्रबळ इच्छाशक्ती, धोरणात्मक कौशल्य आणि सततचे प्रोत्साहन आमच्या या संघर्षाचा कणा राहिले आहे. मला भवानीपूरमधून निवडणूक लढवण्याची सूचना दिल्याबद्दल धन्यवाद.
मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, जे.पी. नड्डा, सुनील बन्सल, भूपेंद्र यादव, अमित मालवीय, समिक भट्टाचार्य, आमचे सर्व राष्ट्रीय व राज्यातील नेते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बंगालच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या शूर कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले आणि ज्या हजारो भाजपा कार्यकर्त्यांनी हसतमुखाने संकटांचा सामना केला, हा विजय तुमच्या त्याग आणि घामाचा आहे. तुम्हीच खरे नायक आहात. आता आपण सेवेच्या भावनेने पुढे जाऊया आणि एक असा पश्चिम बंगाल घडवूया जिथे शांतता नांदेल आणि राज्य प्रगती अन् विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.
West Bengal Live Updates : "ममता बॅनर्जींना मुस्लिमांनी मतदान केले, तर मला हिंदूंनी", विजयानंतर सुवेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया
भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर आपले प्रमाणपत्र दाखवले. ते म्हणाले, "हे खूप महत्त्वाचे होते. ममता बॅनर्जी यांचा पराभव करणे अत्यंत गरजेचे होते. हे ममता बॅनर्जींचे राजकारणातून निवृत्त होणे आहे... यावेळीही त्यांचा १५ हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. मुस्लिमांनी त्यांना उघडपणे मतदान केले. वॉर्ड क्रमांक ७७ मध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या सर्व मुस्लिमांनी ममतांना मतदान केले, तर हिंदू, शीख, जैन आणि बौद्धांनी मला आशीर्वाद देऊन विजयी केले. हा विजय हिंदुत्वाचा विजय आहे... सीपीएमच्या (CPM) सर्व खंद्या समर्थकांनी मला मतदान केले. भवानीपूरमध्ये सीपीएमची १३ हजार मते होती आणि त्यापैकी किमान १० हजार मते माझ्याकडे वळली. मी तेथील सीपीएम मतदारांचेही आभार मानतो. सर्व बंगाली हिंदूंनी मला उघडपणे मतदान केले. त्यांच्यासोबतच गुजराती, जैन, मारवाडी, पूर्वांचली आणि शीख समुदायानेही मला भरभरून मतदान केले... अमित शहा यांनी मला दोन-तीनदा फोन केला होता. त्यांनी भवानीपूरबद्दल काहीशी चिंताही व्यक्त केली होती. मी त्यांना काही वेळापूर्वीच सांगितले. मी इतर कोणाशीही बोललो नाही. मला फोन वापरण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे मी बोललो नाही. मी आता त्यांना सांगणार आहे, ते वाट पाहत आहेत. मला नंदीग्रामचे प्रमाणपत्रही घ्यायचे आहे"- सुवेंदू अधिकारी
LIVE:ममता बॅनर्जींचा मोठा पराभव! TMC च्या बालेकिल्ल्यात सुवेंदू अधिकारींचा धमाका, १५ हजार मतांनी विजय
पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५ हजार १०० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. स्वतःच्या बालेकिल्ल्यातही ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागल्याने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या विजयासह सुवेंदू अधिकारी पुन्हा एकदा 'जायंट किलर' ठरले असून बंगालमध्ये भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

West Bengal Election Results 2026 LIVE TMC vs BJP Party-wise Seat Tally : पश्चिम बंगाल निवडणूक निकालाचे अपडेट्स जाणून घ्या
