पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी घरवापसी आणि राजकीय दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहे. एकीकडे भाजपातून तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नेत्यांची चर्चा सुरू असताना भाजपातून बाहेर पडलेल्या नेत्याने प्रदेशाध्यक्षांबद्दल खळबळजनक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपा प्रदेशांध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांना चुकीची माहिती पुरवली, असं सोवन चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. बंगालमधील भाजपाच्या पराभवाला भाजपा प्रदेशाध्यक्ष जबाबदार असल्याचा दावा चॅटर्जी यांनी केला आहे. ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.

सोवन चॅटर्जी हे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्वासू समजलं जायचं. चॅटर्जी यांनी ऑगस्ट २०१९मध्ये तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधीच सोवन चॅटर्जी यांनी बैसाखी बॅनर्जी यांच्यासह भाजपाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबद्दल चॅटर्जी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याचबरोबर भाजपातून बाहेर पडण्याच्या कारणांबद्दलही सवाल करण्यात आला. त्यावर भूमिका मांडताना चॅटर्जी म्हणाले,”त्यांनी माझा मतदारसंघ बदलला, त्यामुळे अपमानास्पद वाटलं. जर पराभूत झालेल्या दुसऱ्या नेत्याला त्याच मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं, तर मला का नाही?,” असं चॅटर्जी म्हणाले.

“भाजपामध्ये स्थानिक पातळीवरील माहिती पुरवणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा निवडणुकीसंदर्भातील माहिती पक्षश्रेष्ठींना पुरवते. जेव्हा तुम्ही निवडणूक लढवत असता त्यावेळी स्थानिक पातळीवरील योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं. बूथ आणि स्थानिक पातळीवरील मुद्दे आदी. मात्र, स्थानिक पातळीवरील स्थिती कशी आहे, याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चुकीची माहिती पुरवली गेली,” असं सोवन चॅटर्जी यांनी म्हटलं आहे.

“भाजपात कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नव्हता. तृणमूलमध्ये कुणालाही विचारलं, तरी ते हेच सांगतील. भाजपा नेत्यांना बंगालमध्ये प्रचारासाठी पाठवलं गेलं आणि नेत्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी व्हर्च्युअल बैठका घेतल्या. तृणमूल काँग्रेसने माझ्या देखरेखीखाली दहा निवडणुका लढवल्या, त्यापैकी नऊ निवडणुका जिंकलेल्या आहेत,” असं चॅटर्जी म्हणाले. “२०११ मध्ये माझ्यावर ४२ जागांची जबाबदारी होती. ४२ जागांपैकी मी ३९ जागां निवडून आणल्या होत्या. २०१६ मध्येही मी ४० जागा निवडून आणल्या. भाजपा माझ्याशी संपर्कसुद्धा केला नाही. माझा प्रस्तावसुद्धा भाजपाने ऐकून घेतला नाही, फेटाळून लावला,” असंही चॅटर्जी यांनी म्हटलं आहे.