West Bengal Baruipur Minor Girl Case Saayoni Ghosh Go Back Protest video: पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका ११ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार सायोनी घोष आणि आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना तीव्र जनआक्रोशाचा सामना करावा लागला. संतप्त नागरिकांनी सायोनी घोष यांच्या गाडीला वेढा घालत ‘गो बॅक’, ‘गद्दार’ आणि ‘बेईमान’ अशा घोषणा दिल्या. इतकेच नव्हे तर, “किती रुपयांना विकली गेलीस?” असा आक्रमक सवाल करत स्थानिकांनी खासदार महोदयांना धारेवर धरले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्वतःच्याच मतदारसंघात सायोनी घोष यांना अशा प्रकारे तीव्र जनआक्रोशाला सामोरे जावं लागलं आहे.

चिमुरडीला जिवंत असतानाच गोणीत बांधून तलावात फेकले; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

बारुईपूर येथील एका तलावात ११ वर्षांच्या मुलीचा मृतदेह एका गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मुलीच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि क्रूर माहिती समोर आली आहे. नराधमांनी चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर, ती जिवंत असतानाच तिला गोणीत भरले आणि तलावात फेकून दिले. श्वास गुदमरून आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर लोकांचा राग अनावर झाला असून, संतापलेल्या जमावाने मुख्य आरोपीच्या एका निकटवर्तीयाची ठेचून हत्या केली. यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ममता बॅनर्जींशी बंडखोरी भोवली? नागरिकांचा थेट सवाल “इतके दिवस कुठे होतात?”

सायोनी घोष पीडितेच्या घराच्या दिशेने जात असतानाच तिथे उपस्थित असलेल्या शेकडो महिला आणि पुरुषांनी त्यांचा मार्ग रोखला. ज्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सायोनी घोष यांना राजकारणात आणले, मोठी ओळख दिली, त्यांच्याशीच सायोनी यांनी गद्दारी केल्याची भावना येथील मतदारांमध्ये पाहायला मिळाली.

स्थानिक महिलांनी खासदारांना थेट जाब विचारत म्हटले की, “घटना घडून तीन दिवस उलटल्यानंतर खासदार महोदयांना मतदारांची आठवण आली का? इतके दिवस तुम्ही कुठे होतात?” या गदारोळातच कसाबसा मार्ग काढत सायोनी यांनी पीडितेच्या आईची भेट घेतली.

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत…” – सायोनी घोष

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द उरलेले नाहीत. आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत. कोणत्याही आईला तिचे अपत्य अशा क्रूर पद्धतीने गमवावे लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ही वेळ राजकारण करण्याची किंवा पक्ष पाहण्याची नाही. आपण सर्वांनी या अमानुष कृत्याविरोधात एकत्र आले पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून दोषींना फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन,” असे भावनिक आश्वासन सायोनी घोष यांनी रडवेली होत पीडितेच्या कुटुंबाला दिले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप; नव्या सरकारची पहिली मोठी परीक्षा

बारुईपूरमधील ही अमानुष घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये नुकतेच मोठे राजकीय सत्तांतर झाले आहे. मे महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकांमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी फूट पडली आहे.

  • खासदार-आमदारांचे मोठे बंड: टीएमसीच्या २८ लोकसभा खासदारांपैकी तब्बल २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये सायोनी घोष यांचाही समावेश आहे. याशिवाय, विधानसभेतील ८० पैकी सुमारे ६० आमदारांनी बंड पुकारले आहे.
  • सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्रिपदी: या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर राज्यात भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. नव्या सरकार समोरील ही पहिलीच मोठी कायदा-सुव्यवस्थेची परीक्षा मानली जात आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी स्वतः बारुईपूरला भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली असून कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

या घटनेनंतर बंगालचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ नाथ गुप्ता यांनीही बारुईपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “या प्रकरणात तपास अत्यंत वेगाने सुरू असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झाला असल्यास, त्याचीही चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे संपूर्ण बारुईपूर परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.