पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेची विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने जिंकली. २ मे २०२१ रोजी लागलेल्या निवडणूक निकालात भाजपाला रोखत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात आहे. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय राजीनाम देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ममता बॅनर्जा यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २९२ जागांपैकी २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १,९५६ मतांनी पराभव केला. असं असलं तरी पक्षानं त्यांची नेतेपदी निवड केली आणि ५ मे २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ममता दीदींना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून त्यांनी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाची निवड केली आहे. ममता दीदी या मतदारसंघातून यापूर्वी विजयी झाल्या आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. तर शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढवली होती. चट्टोपाध्याय यांना या मतदारसंघातून ५७.७१ टक्के मतं पडली आहेत. शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भाजपा उमेदवार सुद्रनील घोष यांना ५० हजारांहून अधिक मतांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे ममता दीदींना या मतदारसंघाची निवड केली असल्याचं बोललं जात आहे. शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला तरी ममता बॅनर्जी सरकारमध्ये कृषिमंत्रीपदी राहतील असं सांगण्यात येत आहे.

Narada Sting Case: तृणमूलच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवा; कोलकाता हायकोर्टाचा आदेश

२०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपा तिसऱ्या स्थानी होतं. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांचं विजयी अंतर कमी झालं होतं. तेव्हा त्यांनी काँग्रेस उमेदवार दीपा यांना २५,३०१ मतांनी पराभूत केलं होतं. मात्र यावेळेस त्यांनी भाजपाला आव्हान देत नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता आणि भवानीपूर मतदारसंघ सोडला होता.