करोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होमचे फायदे बरेच आहेत. मात्र त्यामुळे काम नोकरी करणाऱ्या महिलांवर तिप्पट भार पडू लागला आहे, अशी चिंता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. मनोरमा ईयरबुक २०२२ मध्ये त्यांनी तरुणांना लिहिलेलं एक पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यात याबद्दलचा उल्लेख आढळतो. या आपल्या पत्रात राष्ट्रपती म्हणतात, महिलांवर नोकरी आणि घरकाम या दोन्हीचं ओझं आहे. त्यात वरून मुलं आता घरूनच शाळा शिकू लागली आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणं, शाळेत नीट लक्ष देतात की नाही याची काळजी घेणं ही पालकांची जबाबदारी आहे. हे काम पुन्हा आईवरच येऊन पडतं. पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या जोडीदारांचा थोडा भार हलका करण्याचा प्रयत्न करायला हवा. या महामारीने आपल्याला पर्यावरणीय बदलांशी लढण्यासाठी काय करता येईल याविषयीही काही गोष्टी शिकवल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. ही महामारी अचानक आलेलं संकट आहे. मात्र ही महामारी पुढे येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल असू शकते, असंही राष्ट्रपती कोविंद यांचं म्हणणं आहे. राष्ट्रपती पुढे लिहितात, पर्यावरणीय बदल हे आता केवळ वैज्ञानिक संशोधन आणि धोरण आखण्यापुरती गोष्ट राहिलेली नाही. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी आपल्याकडे वेळही अगदीच कमी आहे. जेव्हा आपल्या सर्वांचंच अस्तित्व करोना विषाणूमुळे धोक्यात आलं होतं, त्यावेळी आपण पाहिलं की आपल्या क्षमता काय आहेत. करोनाने दाखवून दिलं की विज्ञानाचा आदर करून सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन जर काम केलं तर मानव काय करू शकतो.