माजी पंतप्रधान आणि एक मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीत. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते. गेल्या काही वर्षांमध्ये तर ते राजकारणत फारसे सक्रियही नव्हते. पण, त्यांची उपस्थिती मात्र अनेकांसाठीच फार महत्त्वाची होती. अशा अटलजींच्या जाण्यामुळे भारतीय राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला प्रत्येकजण या लोकप्रिय नेत्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. कला आणि राजकीय विश्वात समतोल राखत त्यांत सुरेख मेळ साधणाऱ्या वाजपेयी यांची अशीच एक आठवण सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

एक व्यक्ती म्हणून अटलजी नेहमीच सर्वांच्या मनात घर करुन गेले. अशा या मोठ्या मनाच्या व्यक्तीविषयीची आठवण सांगताना रशिद किडवई यांनी एक किस्सा सांगितला आहे. ज्यावेळी शासकीय भोजनाच्या निमित्ताने अटलजी एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. खरंतर त्यावेळी त्यांच्या आहाराच्या सवयींवर बरंच नियंत्रण होतं. ते डाएटवर होते. पण, तरीही त्यांनी जेवणाच्या पंगतीच्या दिशेने जाण्याचं ठरवलं. त्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी म्हणून मग त्यांच्या सहकाऱ्यांनी एक बेत आखला. त्यांनी लगेचच त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट वाजपेयी यांच्याशी करुन दिली. ज्यानंतर ते माधुरीसोबतच चित्रपट आणि इतर मुद्द्यावर चर्चा करण्यात रमले. हीच वेळ साधत त्यांच्या नजरेआडून जेवणाच्या पंगतीतून / काऊंटरवरुन गोडाचे पदार्थ हटवण्यात आले होते आणि माधुरीमुळे अटलजींचं गोडाचे पदार्थ खायचं राहूनच गेलं

वाचा : अग्रलेख: गीत नहीं गाता हूँ..

ही आठवण पाहता खऱ्या अर्थाने ते एक सच्चे खवय्ये होते, हेसुद्धा लगेचच लक्षात येत आहे. खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीस सांगावं तर, स्थानिक पदार्थांची लज्जत त्यांना विशेष भावली होती. कोलकात्याचा पुचका, हैदराबादची बिर्याणी, हलीम आणि लखनऊचे गिलौटी कबाब हे त्यांच्या आवडीचे पदार्थ, त्याशिवाय चहा आणि चाट मसाला शिवरलेली गरमागरम भजी या पदार्थांनाही त्यांची पसंती होती. आपल्या सहकाऱ्यांसोबत खाण्याच्या पंगतींमध्येही ते तितक्याच मोठ्या मनाने रमत, हासुद्धा अटलजी यांच्या स्वभावाचा एक खास पैलू आहे हे खरं.