who is Suvendu Adhikari and explore his journey : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. मुख्यत्वे भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांची लढत लक्षवेधी ठरली. अवघ्या देशाचं लक्ष या जागेवर होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ममता बॅनर्जींचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. नंदिग्राम मतदारसंघातूनही ते विजयी झाले आहेत. तसंच, पश्चिम बंगालमध्ये भाजपाा स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी चर्चा आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा, वैयक्तिक आयुष्य कसं हे जाणून घेऊयात.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा (TMC) बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखले जाते. अधिकारी कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. परंतु, ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अधिकारी कुटुंब या पक्षात सामिल झाले.

वडील केंद्रीय मंत्री अन् भाऊही राजकारणात

सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. शिशिर यांना इतर तीन मुले असून सुवेंदू, दिब्येंदू आणि सर्वात धाकटा सौमेंदू हे तिघेही राजकारणात आहेत. 

सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

वडिलांप्रमाणेच सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवासही काँग्रेसमधून सुरू झाला. पुढे त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. एका वर्षानंतर, ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम आणि सिंगूरमधील जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनादरम्यान त्यांना मुख्य संघटक बनवण्यात आले. अधिकारी यांनी ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत नंदीग्राममधील आंदोलनाचे सारथ्य केले. या आंदोलनाने बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.

ममता बॅनर्जी यांचे खास विश्वासू

राज्यात सत्ता आल्यावर ममतांनी त्यांचे खंदे समर्थक सुवेंदू यांना संसदेत पाठवले. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी तामलुक लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि ते ममतांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक बनले. मात्र, याच काळात शारदा चिट फंड घोटाळा आणि नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांचे नाव आल्याने ते वादातही सापडले. २०१६ मध्ये तृणमूलने दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर सुवेंदू पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले आणि त्यांच्याकडे परिवहन सारखी महत्त्वाची मंत्रिपदे सोपवण्यात आली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बंगालमधील ४२ पैकी १८ जागा जिंकल्यानंतर, सुवेंदू यांच्याकडे विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे तृणमूलने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या खडगपूर सदरसह तिन्ही पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळवला.

सुवेंदू यांनी टीएमसीची पक्ष संघटना झपाट्याने मजबूत केली आणि पूर्व मेदिनीपूरच्या पलीकडे आपला प्रभाव वाढवला, तसेच बांकुरा, पुरुलिया आणि पश्चिम मेदिनीपूर या जंगलमहल जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव विस्तारला. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर राज्याच्या अनेक भागांमध्ये, प्रामुख्याने जंगलमहल, मालदा आणि मुर्शिदाबाद येथे टीएमसीचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आणि दक्षिण बंगालमधील पक्ष संघटनेत, विशेषतः हल्दिया बंदर परिसरात, तसेच हल्दिया औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटनांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक दृढ झाला.

सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलशी नाते कसे तोडले?

एकेकाळी ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जाणारे सुवेंदू अधिकारी २०२० च्या अखेरीस त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले. तृणमूल सोडण्यापूर्वी ते पक्षात अत्यंत शक्तिशाली नेते होते. मात्र, ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पक्षात वाढलेली ताकद अधिकारी कुटुंबाला रुचली नाही. पक्षाबद्दलची त्यांची नाराजी त्यांच्या पक्षांतराच्या बराच काळ आधीपासून दिसून येत होती. त्यांनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणे बंद केले होते आणि तृणमूल नेते सौगत रॉय यांनाही त्यांना रोखण्यात अपयश आले. नोव्हेंबर २०२० मध्ये सुवेंदू यांनी परिवहन आणि जलसंपदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्याला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे नंदीग्राममध्ये आव्हान देण्याचे ठरवले. प्रचारादरम्यान ममतांनी सुवेंदू यांचा उल्लेख ‘गद्दार’ आणि ‘मीर जाफर’ असा केला. मात्र, या निवडणुकीत अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून सुमारे १९०० मतांनी पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले. ममतांचा पराभव झाला असला तरी, त्यांच्या पक्षाने २१३ जागा जिंकून तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला, तर भाजपला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीतही सुवेंदू अधिकारी जायंट किलर ठरले आहेत. ममता दीदींना राज्यभरात त्यांनी धूळ चारली आहे. पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांची तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यात भाजपाला यश आलं असून यामागे सुवेंदू अधिकारी यांचं मोठं श्रेय आहे.