करोनारुपी राक्षसामुळे सर्वसामन्यांचं जगणं कठीण झालं आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी काहीसी स्थिती निर्माण झाली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनही गरजेचं आहे. त्याचबरोबर रोजच्या जगण्यासाठी कामधंदा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात करोनामुळे महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक किंमतीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर डोकेदुखी वाढवणारा आहे. डाळी, फळं आणि अंडी-मांस यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मार्च महिन्यात महागाई दर हहा ७.३९ टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये हा महागाई दर १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास ३.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे. Wholesale price-based inflation at 10.49% in April, against 7.39 % in March: Govt of India pic.twitter.com/F6rAufWvoV — ANI (@ANI) May 17, 2021 केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांची आकडेवारी समोर ठेवली आहे. फेब्रुवारीत महागाई दर ४.८३ टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर २.५६ टक्क्यांनी वाढला आणि ७.३९ टक्क्यांवर पोहोचला. तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर ३.१ टक्क्यांनी वाढला असून तो आता १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.