पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये दोन वेळा मंत्री राहिलेले राजीव बॅनर्जी आज भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे टीएमसी सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. बॅनर्जी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच त्रिपुराचे भाजपा आमदार आशिस दास यांनी त्रिपुरामध्ये आज अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "भाजपा नावाच्या विषाणूला फक्त एकच लस आहे. तिचे नाव आहे ममता बॅनर्जी. त्रिपुरातील लोकांना या विषाणुविरोधात डबल डोस द्यावा लागेल. पहिला स्थानिक निवडणुकांमध्ये आणि दुसरा २०२३च्या विधानसभा निवडणुकीत." पुढील महिन्यात त्रिपुरातील सर्व स्थानिक निवडणुकांच्या जागांवर तृणमुल काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. "आम्ही त्रिपुरामध्ये डावे आणि उजवे दोन्ही संपवू. त्रिपुरामध्ये बंगाल निवडणुकांची पुनरावृत्ती होईल," असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.