मला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, राज्यसभेत देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं व्यंकय्या नायडू यांनी आपल्या छोट्याश्या भाषणात म्हटलं आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतीपदाची निडवणूक जिंकले ज्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा सत्कार केला. त्याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी माझ्या परिनं पूर्ण प्रयत्न करेन, लोकांसाठी संसदेची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो, राज्यसभेत लोकांच्या हितासाठी विधेयकं आणली जातात, त्यातून लोकांचं हित कसं होईल हे पाहणं ही माझी प्राथमिकता असेल असं आश्वासनही व्यंकय्या नायडू यांनी दिलं आहे.

आजवर या पदावर अनेक नामवंत व्यक्ती बसल्या आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदन चालवलं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझं काम करेन, राज्यसभेला एक सक्षम आणि उपयुक्त पर्याय म्हणून लोकशाहीत स्थान मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे हे मी जाणतो. या दृष्टीनं माझी भूमिका निभावण्याचा मी प्रयत्न करेन सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेन असंही नायडू यांनी म्हटलं आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी पहिल्यांदाच ही भूमिका मांडली आहे. त्यांच्या विरोधात यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी होते ज्यांचा नायडू यांनी पराभव केला. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपतो आहे. त्यानंतर ११ ऑगस्टला व्यंकय्या नायडू हे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.