India-Pakistan tensions: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला. त्यातच ७ मे रोजी रात्रीच्या वेळेस भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त झाले. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे रोजी देशात २५९ ठिकाणी युद्धसराव करण्याचे निर्देश दिले आहेत. १९७१ साली याप्रकारे शेवटचा युद्धसराव देशभरात केला गेला होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धाचे स्मरण केले जात आहे. आपल्या जीवावर उदार होऊन पाकिस्तानमधून भारताला महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या महिला गुप्तहेरामुळे हे युद्ध निर्णायक टप्प्यावर आले होते.

२०१८ साली पंजाबच्या मारेलकोटला येथे एका लष्करी अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू झाला. ही महिला कुणी साधारण महिला नव्हती. तिच्या मुलाला आईच्या बलिदानाची पूर्ण कल्पना होती. याच महिलेने १९७१ च्या युद्धात भारताला महत्त्वपूर्ण माहिती मोक्याच्या क्षणी पाठविल्यामुळे भारताचे लढाऊ जहाज आयएनएस विक्रांत पाकिस्तानचे लक्ष्य ठरण्यापासून वाचले होते.

नेमके प्रकरण काय?

दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या आणि भविष्याचे स्वप्न पाहत असलेल्या सेहमत खानला तिचे वडील हिदायत खान अचानक जम्मू आणि काश्मीरला बोलवून घेतात. घरी आल्यावर वडील तिला शेवटची इच्छा बोलून दाखवता आणि देशासाठी बलिदान देण्यात प्रेरित करतात. हरिंदर सिंग सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कांदबरीत २० वर्षीय सेहमतचा भारतासाठी केलेला त्याग वाचून कुणाचाही उर भरून येईल. याच कांदबरीवर आधारित ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

२० वर्षीय सेहमत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शास्त्रीय नृत्य आणि व्हायोलिन वाजविण्यास शिकत होती. हे सर्व सोडून वडील हिदायत खान यांनी तिला देशासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन हेरगिरी करण्यास सांगितले. यासाठी तिला पाकिस्तानच्या लष्करात ब्रिगेडियर असलेले परवेज सय्यद यांचा मुलगा लष्करी अधिकारी इकबाल सय्यद याच्याशी लग्न करावे लागले.

सेहमतचे वडीलही साधारण व्यक्ती नव्हते. ते भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’साठी काम करत होते. जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ते व्यापारी म्हणून वावरत असताना त्यांनी १९६५ च्या युद्धातही हेरगिरी केली होती. कर्करोगाने ग्रासले असतानाही हिदायत खान यांनी देशाची सेवा केली. तसेच आपल्यानंतर हे काम मुलीकडे सोपविले.

सिक्का यांनी कादंबरीत लिहिले की, सेहमतने वडिलांचा मान ठेवून गुप्तचर यंत्रणेत काम सुरू केले. हे काम जोखमीचे होते. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येईल की नाही, याची शाश्वती नव्हती, असे असतानाही सेहमतने हे आव्हान पेलले.

मिशन काय होते?

सेहमतला प्रथम मानव चौधरी यांनी प्रशिक्षण दिले आणि तिचे मिशनही समजावले. त्यांचे सांकेतिक नाव मीर होते. मानव चौधरी नंतर ‘रॉ’चे प्रमुख झाले होते. पाकिस्तानच्या उच्च लष्करी वर्तुळातील आतली माहिती भारताला देणे, हे सेहमतचे प्राथमिक काम होते. सेहमतने इकबालशी लग्न केले आणि ती पाकिस्तानला गेली. पाकिस्तानमध्ये गेल्यावर माहिती काळजीपूर्वक ऐकणे आणि निरीक्षण करणे, याचे प्रशिक्षण सेहमतला देण्यात आले होते. आणीबाणीच्या परिस्थितीत मोर्स कोड वापरून रिले एसओएस संदेश देण्याचे प्रशिक्षण सेहमतला देण्यात आले होते.

लग्नानंतर सेहमतने हळूहळू घरातील लोक, नातेवाईक, नोकर-चाकर, लष्करी निवासातील शेजारचे लोक यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले. महाविद्यालयात शिकलेले संगीत आणि नृत्याचे कौशल्य वापरून आर्मी स्कूलमधील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसविले. यामध्ये जनरल याहा खान यांच्या नातूचाही समावेश होता. तिने पाकिस्तानी संरक्षण विभाग आणि गुप्तचर संस्थांची माहिती मोठ्या खुबीने मिळवली.

पूर्व पाकिस्तानने (आताचे बांगलादेश) मध्ये स्वातंत्र्याचे आवाहन केल्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. १९७१ मध्ये, भारताने हस्तक्षेप करून पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करण्याचा निर्णय घेतल्याने युद्ध सुरू झाले.

आयएनएस विक्रांतची महत्त्वाची भूमिका

भारताकडे त्यावेळी असलेले लढाऊ विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतने भारताच्या विजयात आणि बांगलादेशच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा वाटा उचलला. भारताची ही जमेची बाजू पाकिस्तानला ठाऊक होती. म्हणून त्यांनी बंगालच्या उपसागरात उभ्या असलेल्या जहाजाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली पाकिस्तानची पाणबुडी पीएनएस गाझीवर भारताचे महाकाय आयएनएस विक्रांत नष्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

पाकिस्तानमध्ये हेरगिरी करणाऱ्या सेहमतला पाकिस्तानच्या योजनेबद्दल माहिती मिळाली. पीएनएस गाझीच्या स्थानाबद्दलची महत्त्वाची माहिती तिने भारताला पुरविली. यानंतर भारतीय नौदलाने विशाखापट्टणम बंदरानजीक पीएनएस गाझीचा मुकाबला करण्याची योजना आखली.

सेहमतने वेळेवर दिलेली मौल्यवान माहिती हे धाडसी कृत्य होते. ही माहिती मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न धोक्यांनी व्यापलेले होते. माहिती गोळा करत असताना सय्यद यांच्या कुटुंबातील नोकर अब्दुलला सेहमतच्या हालचालीवर संशय होता. तो सय्यद कुटुंबाला कल्पना देईल, असा संशय आल्यानंतर सेहमतने त्याच्यावर ट्रक चालवून त्याची हत्या केली.

सेहमतच्या धाडसाचे कौतुक करताना, सिक्का २०१९ मध्ये एका मुलाखतीत म्हटले, “अब्दुलच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या मेहबूब सय्यदचीही हत्या सेहमतने केली. मेहबूब सय्यद हा लष्करी अधिकारी आणि सेहमतचा दीर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉलिंग सेहमतमध्ये एक चित्तथरारक प्रसंग चितारण्यात आला आहे. मेहबूब सय्यदची हत्या केल्यानंतर सेहमत जेव्हा घरी जाते, तेव्हा मेहबूब सय्यदची पत्नीने आपल्या पतीसाठी पेस्ट्री बनवल्या होत्या. तिचा पती परत येणार नाही, हे माहीत असूनही सेहमतने त्या पेस्ट्री चाखल्या आणि त्यावर प्रतिक्रिया दिली. याप्रकारचे कृत्य करायला खूप धाडस लागते, असे कांदबरीत नमूद केले आहे.