भारतीय जनता पक्ष 'सबका साथ, सबका विकास' या उद्देशाने काम करत आहे आणि सर्वांना समान संधी प्रदान करत आहे. पूर्वीचे सरकार 'मैं और मेरा खानदान' या उद्देशाने काम करत होते. जेव्हा यूपीच्या लोकांना त्रास होत होता, तेव्हा सपा आणि बसपा गायन आणि नृत्य शो आयोजित करत होते, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर केली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय दौऱ्यांना वेग आला आहे. योगी आदित्यनाथ अयोध्या, वाराणसी, गाझीपूर आणि जौनपूरसह राज्यातील चार जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी योगी म्हणाले, "गुंड आणि माफियांचा कसा सामना करावा, हे सरकारला चांगले माहित आहे. भाजपा सरकार त्यांच्यावर बुलडोझर चालवत आहे." भाजपा जातीचे राजकारण करत नाही "५ ऑगस्ट २०२० रोजी ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली, जेव्हा पंतप्रधान मोदींनी राम मंदिराची पायाभरणी केली. सपा आणि बसपाने असे कधी केले असते का?" असा प्रश्न देखील योगी यांनी उपस्थित केला. भाजपा जातीचे राजकारण करत नाही. समाजात सामाजिक एकोपा आणण्याचे काम भाजपाने केले आहे, असे देखील योगी यांनी ठासून सांगितले. "आधीच्या सरकारांनी अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीयांसाठी काहीही केले नाही. भाजपा सरकारने अनेक सार्वजनिक योजना लागू केल्या. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने साकार करणाऱ्या कल्याणकारी योजना सरकारने आणल्या. या योजनांमुळे वंचितांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाला." असे योगी म्हणाले.