महात्मा गांधी हे ब्रिटिशांचे हस्तक होते व सुभाषचंद्र बोस हे जपानचे हस्तक होते, अशी विधाने करणारे माजी न्यायाधीश मरकडेय काटजू यांच्याविरोधात निषेधांचा ठराव संसदेने करण्यात काहीही चुकीचे नाही, असे सकृतदर्शनी वाटते असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. सार्वजनिक मंचावर त्यांनी जी वक्तव्ये केली आहेत, त्यावर काटजू यांनी टीका स्वीकारण्यास तयार असावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
याबाबत काटजू यांनी निषेधाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी वरिष्ठ वकील फाली एस नरीमन व महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी मदत करावी, असे  न्यायालयाने म्हटले आहे. काटजू यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की लोकसभा व राज्यसभा सदस्यांनी मार्च महिन्यात संमत केलेला निषेधाचा ठराव अलाइस इन वंडरलँड मधील क्वीन हार्ट्स प्रमाणे असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्याचे ऐकून न घेताच ती कृती करते त्याप्रमाणे विधिमंडळाची कृती असल्याचे त्यांचे मत आहे. नैसर्गिक न्यायात एखाद्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याचा निषेध करायचा नसतो पण या तत्त्वाकडे फार लक्ष दिले गेले नाही.