भाजपचा बिहारमध्ये पराभव झाला. (ये, कोण हसतोय रे तो तिकडे केशवकुंजात? गप्प बसा पाहू.) अगदी कमरतोड पराभव झाला. तो कशामुळे झाला?

आजकाल जो उठतो तो त्याची कारणे सांगत आहे. दैनिके घ्या, वृत्तरंजन वाहिन्या घ्या.. सगळीकडे तीच ती कारणे. गाय, पाकिस्तान, मोहनराव भागवत.. काय काय कारणे देताहेत. बरे, त्याला मान डोलावण्याशिवाय आपल्याकडे अन्य काही पर्याय असतो का? आता समजा, कोणी असे सांगितले की भैया, शेवटच्या सभेत नरेंद्रभाईंच्या जाकिटाचा रंग पिवळा नव्हता म्हणून भाजपचा पराभव झाला; तर आपण त्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाचा प्रतिवाद तरी कसा करणार? मुंडी हलवावीच लागणार ना आपल्याला!
आमचे म्हणणे काय आहे- पराभवाची कारणे काय कोणीही सांगू शकतो. आमचे ‘झी’वाले उदय निरगुडकरसुद्धा (पक्षी : गरीबांचे योगेंद्र यादव!) सांगत होते.
(परवा पाहिले का हो त्यांना ‘झी’वरच्या दिवाळी कार्येक्रमात? काय क्यूट दिसत होते ना, पहिला दिवाळसण असल्यासारखे! तो खास लख लख फेशियली चेहरा, तो नाकावरचा चष्मा, ते डोळ्यांतले सातमजली हसू.. आणि अहाहा! ती लालम् लाल वेलबुट्टीदार शेरवानी.. मनगटावर फक्त मोगऱ्याचा गजरा नव्हता! पण तुम्हांस सांगतो, त्यांना पाहून आमच्या सुबोध भाव्यांच्या काळजात कटय़ारच घुसली असेल! वाटले असेल, पिळगावकरांच्या सचिनऐवजी निरगुडकरांच्या उदयभाऊंनाच का नाही घेतले ‘कटय़ारी’त खांसाहेब म्हणून? ओव्हरअॅक्टिंग तरी नसती केली! असो.)
त्या निरगुडकरांचे सोडा; किंवा त्यांचा च्यानेल बदला, पण आमच्या सोसायटीचा वॉचमन! त्यानेसुद्धा भाजपच्या पराभवाची मीमांसा करावी? हे म्हणजे टू मच्चच झाले. पण मग मनी आले, पराभव झाल्यानंतर त्याची कारणे काय कोणीही सांगू शकतो. का की ते सोपे असते. विजयासाठी त्यांनी नेमके काय करायला हवे होते, हे मात्र कोणीच सांगत नाही.
ते पाहून आम्ही ठरवले, की कोणी सांगत नसेल तर का न आपणच जाऊन पुसावे, की काय केले असता बिहारात मोदींचा विजय झाला असता? त्यानुसार गेल्या काही दिवसांत आम्ही भिन्न भिन्न क्षेत्रांतील विविध मान्यवरांना भेटलो. त्यातून आम्हांस जे गुह्यज्ञानकण प्राप्त झाले ते आपल्या जीकेवृद्धीकरिता येथे सादर करीत आहोत..
शरद पवार (पक्षी : जाणते राजे, प. महाराष्ट्र)- विजयाच्या संबंधाने निकाल घेण्यासंदर्भात मोदींनी लोकशाही पद्धतीने काम करून जनतेला बळ देण्याच्या संबंधाने विचार करायला हवा होता.. (यावर काहीच न कळून आम्ही त्यांना विचारले, की म्हणजे नेमके काय? तर ते एकदम दूरवर पाहत म्हणाले, ते आम्हाला समजले असते तर..)
राज ठाकरे (अध्यक्ष, मनसे)- हॅ! मोदींचा काय तो प्रचार होता? त्यापेक्षा आमचे ते.. कोण ओ ते.. सर्देसाई.. ते बरे बोलतात. बरं, नुसतीच ती भाषणं. रटाळ! तुम्ही लोकांसमोर विकासाची काही ब्लू प्रिंट मांडणार आहात की नाही? प्रत्येक सभेत त्यांनी जर योग्य पद्धतीने प्रेझेन्टेशन केलं असतं तर आज पाटण्यात त्यांचे फटाके फुटले असते. कॅय?
देवेंद्र फडणवीस (मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)- ऑफ द रेकॉर्ड सांगतो. जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. महाराष्ट्रात आज पाच हजार तीन गावांमध्ये हे अभियान आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवीत आहोत. पण अधिकारी ऐकत नाहीत हो नीट..
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख व मा. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र सरकार)- मोदींनी मराठीचा मुद्दा हाती घ्यायला हवा होता. किमान २७ गावांचा तरी!!
रामदास आठवले (भावी मंत्री (आजन्म), केंद्र सरकार)- अगर दिया होता हम को केंद्र में एक खाता। एक नहीं तो कम से कम अर्धा नहीं तो पाव खाता। तो मोदीजी का बिहार में दणदणीत विजय होता।
योगेंद्र यादव (राजकीय विश्लेषक कम् नेते)- साधारणत: पिछडय़ा जनजातींची १३.४ दशमलौ मते आहेत. त्यात यादवांची ८.१ दशमलौ आणि कुर्मी समाजाची मायनस ०.२ दशमलौ मते घेऊन मोदी यांनी सामाजिक अभियांत्रिकीचा अभिनव प्रयोग केला असता तर त्यांच्या विजयाचे र्पसेटेज सुमारे ८.१३ दशमलौ एवढे सुनिश्चित रूपाने झाले असते.
आणि सरतेशेवटी-
शशिकला (अर्थात आमची ही!)- काहीही हं तुमचं! मोदी कुठं उभे होते बिहारमध्ये? मग त्यांचा पराभव कसा होईल? घ्या.. जरा तेल लावा गुडघ्याला.. म्हणजे असे फाल्तूक प्रश्न पडणार नाहीत! (असो!)
balwantappa@gmail,com