'आली माझ्या घरी ही दिवाळी.' म्हणत ज्या सणाचे संपूर्ण राज्यात मोठ्या आनंदात स्वागत केले जाते त्या दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. वसुबारसेनंतर येणारा हा दिवस दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. नावातच धन असल्याने धनाचे महत्त्व सांगणारा हा दिवस दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वातावरणात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या या सणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. आपल्याकडे असलेल्या धनाची पूजा करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू असतो. व्यापारी वर्गात दिवाळीतील या दिवसाला विशेष महत्त्व असते. या दिवशी व्यापारासाठी आवश्यक असणाऱ्या वह्यांचे पूजन केले जाते. त्यामुळे पुढील वर्षातील व्यवसायात वृद्धी होईल अशी धारणा व्यापाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे आहे. याशिवाय सामान्यांमध्ये या दिवशी सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. असे केल्यास वर्षभर घरात धनलक्ष्मी नांदते असे मानले जाते. व्यापाऱ्यांच्याबरोबरच शेतकऱ्यांसाठीही हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. शेतकरीही आपल्या शेतात आलेल्या धान्याची या दिवशी पूजा करतात. यावेळी धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. वैद्य या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. भारतीय आयुर्वेदात धन्वंतरीला बरेच महत्त्व आहे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.