'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.' असे म्हणत आपण दरवर्षी दिव्यांच्या सणाचे मोठ्या आनंदाने स्वागत करतो. बाहेर कडाक्याची थंडी, पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, दारातील आकाशकंदील आणि पणत्या यांनी सजवलेले घर, नवीन कपडे आणि फराळ अशा अतिशय आनंददायी वातावरणात या महाराष्ट्रातील मोठ्या सणाचे स्वागत केले जाते. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस असे म्हटले जाते. गाईला आपल्या देशात आणि विशेषतः हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. त्यामुळे ‘गोवत्स द्वादशी’ म्हणून हा दिवाळीचा पहिला दिवस ओळखला जातो आणि वसुबारसेने दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी दुधदुभत्या जनावरांची पूजा केली जाते. शेतीच्या कामात मदत करणाऱ्या या जनावरांना मनोभावे पूजण्याचे काम शेतकरी आणि घरातील लहानथोर करतात. मुख्यत्वे गाय आणि वासराची पूजा करण्याचा हा दिवस. या दिवशी गाय आणि वासराला गोडा धोडाचा नैवैद्य खाऊ घातला जातो. या दिवशी गावाकडे गोठे स्वच्छ करून सजवले जातात. काही ठिकाणी या दिवशी शेतात शेणाच्या गवळणी आणि श्रीकृष्णाची मुर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपण पशूंवर अवलंबून असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. यंदा सायंकाळी ५.५६ ते ८.२६ असा साधारण अडीच तास वसुबारसेचा मुहूर्त आहे. दूधदूभत्या जनावरांची गंध, कुंकूम, अक्षता वाहून पूजा केली जाते. गायीला आणि वासराला सुगंधी फुलांचा हार घालून त्याच्या पायावर पाणी सोडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी पुरणपोळी किंवा अनेकांकडे ज्वारीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखविला जातो. काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात. काही जणांकडे या दिवशी गहू, मूग खात नाहीत. काही महिला या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थही खात नाहीत.