वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे आपला दहशतवादी अमल बसवला. प्रारंभी पक्षोपक्षांना आपल्या पंखाखाली घेणाऱ्या ठाकूर मंडळींनी पुढे हितेंद्र ठाकूर यांच्या रूपात स्वत:च राजकारणात उडी घेतली आणि या प्रदेशाचे आपणच तारणहार आहोत अशी द्वाही फिरविली. सगळ्या राजकीय पक्षांनीही त्यांच्यापुढे शरणागती पत्करली. पुढे मात्र ते विकासाच्या मार्गाकडे वळले. त्यांची दहशत विरत चालल्याचा दाखला म्हणजे त्यांच्या पक्षाच्या खासदाराचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव! परंतु याचा अर्थ ते संपले असा घेणे मात्र धाष्टर्य़ाचे ठरेल.

वसई तालुक्याचं क्षेत्रफळ जवळपास ५२६ चौरस किलोमीटर इतकं आहे. पूर्वेला सह्य़ाद्रीच्या रांगा, पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र, उत्तरेला वैतरणा नदी, तर दक्षिणेला कल्याणपर्यंत पोहोचलेली वसईची खाडी. हा संपूर्ण भाग खोलगट- म्हणजे चहाच्या बशीसारखा. पोर्तुगीजांनी या भागाला ‘इएउअकट’ नाव दिलं, तर ब्रिटिशांनी ‘ुं२२ी्रल्ल.’ पुढे स्वातंत्र्यानंतर या गावाचं ‘वसई’ हे नाव अस्तित्वात आलं. हा संपूर्ण भाग नैसर्गिक विविधतेने नटलेला होता. मुंबई नगरी उभारली जात असताना वसईच्या आमच्या पूर्वजांनीच भाजीपाला, केळी, मासळी आणि दुधाची कावड खांद्यावर घेऊन मुंबईला पोसले. आगाशीचा मोगरा दादरच्या हिंदूंचा खूप आवडता. त्या फुलांच्या दरवळणाऱ्या सुगंधात मुंबईकरांच्या घरातली देवपूजा होई. ब्रिटिश सत्तेनं वसई भागाला ‘मुंबईची फुप्फुसं’ म्हटलं होतं.
इथला प्राचीन काळातला मूळचा समाज कोणता, याचा पत्ता आजही लागत नाही. मात्र, गौतम बुद्ध या भागात येऊन गेल्याचे सांगितले जाते. सम्राट अशोक सोपाऱ्याला पोहोचले होते. इसवी सनापूर्वी हा संपूर्ण भाग बौद्धविचारांचा होता, याची खूण सोपारा येथील बौद्धधर्मीयांच्या ऐतिहासिक वास्तूत सापडते. इ. स. १००० च्या सुमारास शंकराचार्य वैदिक धर्माचा प्रसार करीत येथे आले. त्याची खूण म्हणजे निर्मळ येथे त्यांच्या नावाने प्रचंड मंदिर उभं केलं गेलं आहे. इथे ख्रिश्चनांच्या संत फ्रान्सिस झेवियर यांचंही वास्तव्य होतं. हा सगळा भाग भिन्नधर्मीय साधू-संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झाल्याचं मानलं जातं. हिंदुधर्मीय या भागाला ‘परशुरामाची भूमी’ मानतात.
या भागाला अशी सगळी धार्मिक पाश्र्वभूमी असली तरी या भूभागाला शापही आहे. इथे अनेक घनघोर लढाया झाल्या. त्यांत प्रचंड रक्तपात झाला, अशीही इतिहासात नोंद आहे. वैदिक धर्मीयांनी बौद्धजनांना संपविले. पुढे गुजरातचा सुलतान बहादूरशहा याची सत्ता येथे स्थिरावली. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज येथे आले. सुमारे अडीचशे र्वष त्यांनी येथे राज्य केलं. त्यांनी येथे कॅथॉलिक ख्रिश्चन पंथ उभा केला. पेशवा चिमाजी आप्पा आणि मराठी सैनिकांनी पोर्तुगीजांना शरणागती पत्करावयास लावली. पुढे १८१८ साली पेशव्यांची सत्ता इंग्रजांनी हिसकावून घेतली. इंग्रज वगळता उर्वरित सर्व राज्यकर्त्यांनी येथे रक्तपात घडवून आणला.
तशात या भागावर गुजरातमधून आलेल्या सावकार मंडळींनी आपला जम बसविला. स्थानिकांच्या जमिनी मारवाडी, पारशी, मुसलमान समाजातील सावकारांनी स्वत:च्या ताब्यात घेऊन इथल्या मूळ स्थानिकांना आपली कुळं बनवलं. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात या भागात उत्तर भारतीयांची दहशत निर्माण झाली. वसई स्टेशन परिसरात राहणारा ईश्वर भय्या आणि विरारचा चौरसिया हे इथल्या शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या केळीच्या बागा ताब्यात घेत. शंभर लोंगरी झाली तरी ती पन्नास मोजली जात. या उत्तर भारतीयांनी स्थानिक शेतकऱ्यांची भयंकर आर्थिक लूट केली आणि वसई स्टेशन परिसरात आपली दहशत निर्माण केली. या भागातील उत्तर भारतीयांच्या दहशतीला पहिला धक्का दिला तो विरारच्या भाई ठाकूरने. भाई ठाकूरने चौरसियाच्या कार्यालयात जाऊन त्याला धाक दाखविला. या घटनेतून पुढे भाई ठाकूरची दहशत संपूर्ण वसईभर पसरली.
दरम्यान, मुंबईत दाऊद इब्राहिमचा उदय झाला. परदेशातून विविध वस्तू स्मगलिंगद्वारे त्याने भारतात आणावयास सुरुवात केली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विरारजवळ मच्छिमारांची वस्ती असलेलं अर्नाळा हे गाव आहे. एकदा का या अर्नाळा बंदरात पोहोचलं, की कुणीही जहाजातून जगाच्या पाठीवर कुठंही जाऊ शकतो. स्मगलिंगसाठी या बंदराचा दाऊदने हुशारीने फायदा उठवला.
वसई-विरारचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे पूर्वेकडून जाणारा राष्ट्रीय महामार्ग. हा महामार्ग थेट उत्तरेस काश्मीर ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरला आहे. अर्नाळा बंदरात स्मगलिंगचा माल आला की तो चोवीस तासांच्या आत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचे. त्यातच या बेकायदा धंद्यात महसूल आणि पोलीस यंत्रणेचं साहाय्य मिळविण्यात दाऊदने भाई ठाकूरचा वापर करून घेतला. यावेळेपर्यंत सरकारी अधिकारी दाऊद आणि ठाकूर यांच्या पुरते दबावाखाली आले होते. विरारचा चौरसिया आणि नालासोपारा रेल्वेस्थानकात भरसकाळी सुरेश दुबे या तरुणाच्या झालेल्या खुनात भाई ठाकूरचं नाव आघाडीवर होतं. त्यात तो आरोपी होता. अशातच या काळात वसईतील तलावांतून आणि रेल्वेरुळांवर काही अज्ञात मृतदेह आढळून आले. यातून भाई ठाकूरची वसई-विरार भागांत भलतीच दहशत निर्माण झाली. या दहशतीचा दृश्य परिणाम असा झाला, की स्थानिक लेखक, वकील, डॉक्टर, शाळा-कॉलेजांतील शिक्षक तसेच स्थानिक गुंड सगळेच स्वत:चा आवाज गमावून बसले. या काळात भाई ठाकूरचं गुणगान करण्यात अनेकजण पुढे होते. मॅकाबिले या इटालियन तत्त्ववेत्त्याने म्हटलंच आहे- ‘पैसा नाचवतो.’ ठाकूर मंडळींनी या भागातील धार्मिक, शैक्षणिक आदी संस्थांना पैसा चारून स्वत:च्या पंजाखाली आणलं. यात कॅथॉलिक चर्चचाही समावेश आहे. त्यावेळच्या काँग्रेस, जनता दल, भाजप, शिवसेना आदी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक फंडसुद्धा ठाकूर मंडळींनीच पुरविला.
१९८८ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी या भागातली जवळपास चाळीस हजार एकर जमीन शहरीकरणासाठी खुली केली. त्याला स्थानिकांनी विरोध करण्याचं ठरवलं. त्यावेळी जीवन दर्शन केंद्र, गिरीज येथे एक सभा बोलाविण्यात आली. वसईतील हिंदू संघटनेचे आचार्य सर, साहित्यिक श्रीकांत वर्तक, पत्रकार रॉक काव्र्हालो, भाजपचे यशवंत पाटील, साहित्यिक ना. सी. फडके यांचे चिरंजीव सुधीर फडके, वसई पंचायत समितीचे तत्कालीन सभापती जॉन अल्मेडा, आमदार डॉमनिक घोन्सालविस, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, विलास विचारे आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते या सभेला हजर होते. शहरीकरणाला विरोध आणि ठाकूर यांच्या दहशतीविरोधात उभं राहण्याचा निर्णय या सभेत झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दुसऱ्याच सभेला यातली बरीच नामांकित मंडळी गैरहजर राहिली, ती अगदी शेवटपर्यंत! फा. दिब्रिटो, विलास विचारे आणि मी आम्ही नेटाने याविरोधात ठामपणे उभे राहून शहरीकरण आणि वाढत्या दहशतवादाला तोंड देण्याचा निर्धार केला. अर्थातच त्यावेळी हे करणं काही सोपं नव्हतं. तेव्हा मराठी साहित्यिक म्हणून फा. दिब्रिटो यांची, तर जॉर्ज फर्नाडिस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी माझी या भागात ओळख होती. सुरुवातीला आम्ही वसई तालुक्यात गावागावांतून सभा घेण्याचा सपाटा लावला. त्यातून ठाकूर यांच्या दहशतीची चाहूल लागली. समोर बसलेले नागरिक ठाकूरच्या नावाला घाबरत असत. ‘आमच्या जमिनी ते बळकावतात,’ असं सांगितलं जाई. मात्र, उघडपणे त्यांच्याविरुद्ध कोणीही पुढे येत नव्हतं. गावागावांतून भीतीचं वातावरण होतं. ‘गावांतून संध्याकाळनंतर सर्वत्र भीषण शांतता असते,’ असं अनेक उपस्थित सांगत.
१९९० ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली होती. यावेळपावेतो हितेंद्र ठाकूर युवक काँग्रेसचा तालुका प्रमुख बनला होता. वसई येथील काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभांना हितेंद्र ठाकूरच्या बरोबर शेकडो तरुणांचे जथ्थे असत. तोपर्यंत ठाकूर आणि दहशत ही साथ साथ चालत होती. पुढे ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी जावईशोध लावला- ‘जिंकण्याची क्षमता असलेल्यांनाच आमदारकीचं तिकीट द्यावं. त्यांचा इतिहास पाहण्याची गरज नाही.’ त्यावेळचे तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅड. जे. सी. राजाणी यामुळे काँग्रेस उमेदवारीत मागे पडले. कारण महाराष्ट्राचे एकेकाळचे शक्तिमान मंत्री भाऊसाहेब वर्तक आणि त्यांचे जुनेजाणते सहकारी हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर ठाम राहिले. दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होताच वसई-विरारमध्ये दिवाळी साजरी झाली. दहशतीचा हा उघड उन्माद होता. त्यावेळी अनेकांची बोलती बंद झाली.
जनता दलातर्फे आमदार डॉमनिक घोन्सालविस यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. हरित वसई संरक्षण समितीने त्यांना उघड पाठिंबा द्यावा म्हणून माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळचे समितीचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे आग्रह धरला. दुर्दैवाने विविध कारणे देत फा. दिब्रिटो आणि त्यांचे दोस्त कवी सायमन मार्टिन यांची साथ आम्हाला लाभली नाही. निवडणुकीत हरित वसई संरक्षण समितीचे शेकडो कार्यकर्ते निष्क्रिय राहिले. त्याचाही फायदा हितेंद्र ठाकूर यांना झाला. आम्ही काही कार्यकर्ते सक्रिय राहिलो. जनता दलाचे वरिष्ठ नेतेही गप्प राहिले. अर्नाळा-वसई-विरार आदी ठिकाणी बूथवर बसण्यासाठी आमच्याकडे कार्यकर्तेच नव्हते. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराचा धूमधडाका तर लावलाच; पण घोन्सालविस यांच्याविरोधात नाचक्की करणारी पत्रकंही सर्वत्र लावली. खरं म्हणजे आमदार म्हणून घोन्सालविस यांनी विधानसभेत प्रभावी कामगिरी बजावली होती. सत्तारूढ पक्षाने त्यांना शाबासकीही दिली होती. वसई मतदारसंघ हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. पण अवघ्या दोन-तीन वर्षांत ठाकूर यांनी तो पोखरून टाकला. जनता दल उमेदवार डॉमनिक घोन्सालविस यांचा पराभव झाला.
आताचे आमदार विवेक पंडित हे माझे मित्र. नाटककार विजय तेंडुलकर यांनी विलेपार्ले येथील त्यांच्या घरी बोलावून १९९५ च्या निवडणुकीत, विवेक पंडित विधानसभेला उभे राहत आहेत, तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असा मला मित्रत्वाचा सल्ला दिला. त्यावेळी पंडित यांनी ठाकूर यांच्या दहशतीवर सडकून टीका केली. मात्र, पुढे त्यांचे चेले कॅथॉलिक बँकेच्या निवडणुकीत ठाकुरांच्या समर्थकांबरोबर एकत्र आल्याचे फोटो माध्यमांतून झळकले. स्वत: विवेक पंडितही जातीयवादी पक्षांबरोबर गेल्यामुळे आमचा राजकीय संबंध तुटला. ‘विजय तेंडुलकर यांचा शिष्य शिवसेनेबरोबर कसा?’ हा माझा त्यांना सवाल आहे.
आमदार झाल्यानंतर वसईतील भल्याभल्यांनी हितेंद्र ठाकुरांचा लाभ घेतला. त्यांनीही तो मुक्तहस्ते दिला. जनता दल लयाला गेला. हरित वसई संरक्षण समितीही केवळ ख्रिश्चनांपुरतीच उरली. याच काळात वसई-विरारमध्ये जमिनींच्या खरेदी-विक्रीला ऊत आला. ‘दहशतीमुळेच बहुतेकांना मिळेल त्या किमतीत आपल्या जमिनी विकाव्या लागल्या,’ असं सांगणारे आजही आहेत. मात्र, उघडपणे त्यासंबंधात कुणीही पुढे येत नाही. यात महत्त्वाचं म्हणजे जनता दलाचे उमेदवार म्हणून ज्या डॉमनिक घोन्सालविस यांनी निवडणूक लढविली होती, ते स्वत:च अल्पावधीत ठाकुरांचे समर्थक झाले.
या सगळ्या घडामोडींत हरित वसई संरक्षण समितीच्या हाती जनजागृती करण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. दहशत छुप्या प्रमाणात होतीच. नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक स्थानिकांनी तशी माहिती मला दिली. यासंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम समितीने हाती घेतली. २००० सालापर्यंत आम्ही राज्य व देशपातळीवरील अनेक विचारवंत व निसर्गप्रेमींना वसईत बोलावलं. त्यांची भाषणं ठेवली. प्रचंड मोर्चेही काढले. या काळात केवळ स्थानिक ख्रिश्चनच आमच्या बरोबर होते. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी, विजय तेंडुलकर, गो. रा. खैरनार, पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, स्वामी अग्निवेश, राजदीप सरदेसाई, जनरल युस्टस डिसोझा, निळू फुले, मेधा पाटकर, जॉर्ज फर्नाडिस, निखिल वागळे, सदाशिवराव तिनईकर आदी नामवंतांना वसईत बोलावून त्यांची भाषणं आम्ही आयोजित केली. त्यावेळी कोकण विभागाचे पोलीसप्रमुख उल्हास जोशी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे या भागातील ठाकुरांची दहशत ओसरू लागली. दरम्यान, आघाडीच्या अनेक वृत्तपत्रांनी समितीच्या कामाची नोंद घेत ठाकुरांच्या दहशतीवर प्रकाश टाकला. या सगळ्या बदलत्या वातावरणाचा ठाकूर आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी चांगलाच बोध घेतला. ठाकूर व त्यांचे समर्थक ‘आमची समिती ख्रिश्चन धर्मीयांची आहे,’ असा प्रचार करून इथल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी काळाची पावलं ओळखून तो वेळीच थांबवला आणि पुढे राजकारणाकडे वाटचाल सुरू केली.
या राजकीय वाटचालीत ठाकूर कमालीचे यशस्वी झाले. १९९० ते २०१० पर्यंत हितेंद्र ठाकूर या भागाचे आमदार होते. त्यांना या काळात स्थानिक ख्रिश्चनांचा अपवाद वगळता इथल्या मूळच्या समाजाचा आणि तोवरच्या शहरीकरणामुळे वसई-विरार परिसरात वास्तव्यास आलेल्या नवीन मतदारांचा मोठाच फायदा झाला. आजमितीला ठाकूर यांची दहशत या भागात जवळपास संपलेली आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचा त्यांना असलेला विरोधही बराच मावळला आहे. अनेक ख्रिश्चन राजकीय कार्यकर्ते सध्या ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत क्रियाशील आहेत. गेली पाच वर्षे त्यांच्या आघाडीची वसई-विरार शहर महापालिकेवर निर्विवाद सत्ता आहे.
आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा असं दिसतं की, आमदारकी आणि महापालिकेच्या माध्यमातून ठाकूर यांनी त्यांच्या बहुजन विकास आघाडीतर्फे बरीच लोकोपयोगी कामंही मार्गी लावलेली आहेत. या भागातील रस्त्यांचा दर्जा पूर्वीपेक्षा बराच सुधारला आहे. वसई तालुक्यातील ओस पडलेले तलाव नव्याने सुशोभित करण्यात येत आहेत. माणिकपूर, सोपारा गाव आणि नालासोपारा येथील तलावांभोवती ज्येष्ठ आणि तरुण नागरिक फिरताना दिसतात. अवघ्या चार वर्षांत महापालिकेने स्वत:ची वाहतूक यंत्रणा उभारली आहे. त्याचा फायदा इथले हजारो नोकरी करणारे लोक आणि धंदेवाईक मंडळी घेत आहेत. पूर्वी स्थानिक लोक विहिरींचे पाणी पीत. आज अनेक भागांत नळाद्वारे पाणी आलं आहे. अर्थात त्यात बरीच सुधारणा होणं आवश्यक आहे. महापालिकेचं काम पाहून राज्य सरकारने नेमलेल्या कमिटीने वसई महापालिकेला ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात दाखल केलं आहे. पालिकेद्वारे वार्षिक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं दर्शन घडवलं जातं. गेली सुमारे २५ वर्षे हितेंद्र ठाकूर वसईच्या नरवीर चिमाजी मैदानावर कला-क्रीडा महोत्सव भरवितात. या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अशा वार्षिक उत्सवांतून ठाकूर यांनी वसई-विरार भागातील अनेक तरुण आपल्याभोवती गोळा केले आहेत. वसईचा एकमेव ऑलिम्पिकपटू आनंद मिनेझिस ठाकुर यांच्याकडून वेळोवेळी लाभलेला पाठिंबा मान्य करतो.
असे जरी असलं तरी अन्य महापालिकांप्रमाणेच याही महापालिकेत भ्रष्टाचार चालतो, हे लाचलुचपत विभागाने पकडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरून दिसून येते. तथापि पालिकेची विविध कंत्राटे घेण्यात विरोधकांचे नातेवाईकही काही मागे नाहीत.
ठाकूर यांच्या दहशतीविरोधात हरित वसई संरक्षण समितीने उभारलेल्या आंदोलनांत विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना वसईत पाचारण केलं. त्यातून उभा राहिलेला सामान्यांचा, विशेषत: ख्रिश्चनांचा रोष आणि त्याला प्रसार माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि उल्हास जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य वेळी केलेली कारवाई यांचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकीय दूरदृष्टी असलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आपला मार्ग दहशतीकडून हळूहळू, पण निश्चितपणे विकासाच्या राजकारणाकडे वळविला. पैशामुळे म्हणा वा त्याकाळच्या त्यांच्या दहशतीमुळे म्हणा, त्यांना वसई तालुक्यात राजकीय सत्ता प्राप्त झाली. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोपारा येथे जाहीर सभेत भाई ठाकूर यांचा सत्कार केला होता. हितेंद्र ठाकूर यांच्या धडाकेबाज राजकीय वाटचालीत काँग्रेस तसेच जनता दलाचे काही कार्यकर्ते, शिवसेना व भाजपा या पक्षांचंही साहाय्य त्यांना लाभलं. जेव्हा ठाकुरांची खऱ्या अर्थाने या प्रदेशात दहशत होती, तेव्हा सगळ्याच राष्ट्रीय पक्षांच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांचे ठाकूर यांच्याबरोबर स्नेहाचे संबंध होते. हितेंद्र ठाकूर ही ठाणे जिल्ह्य़ातील अशी एकमेव राजकीय व्यक्ती असावी, की जी दिल्लीतील त्यावेळी काँग्रेसच्या शक्तिमान नेत्या सोनिया गांधी यांना थेटपणे भेटत असे. नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत राज्य सरकारच्या मंत्र्यांची उमेदवारी मागे घ्यावयास लावून त्यांनी आपल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा द्यावयास लावला होता. अशा तऱ्हेनं प्रत्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खाली मान घालावयास लावणं, ही निश्चितच साधी राजकीय घटना नाही. ठाकूर यांच्या राजकीय शक्तीची बलस्थानं जरी वसई- पालघर- डहाणू या परिसरात असली, तरी सर्वच राजकीय पक्षांचे दिल्लीतले धुरीण त्यांनी काबीज केलेले आहेत.
हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. आज त्यांची शेकडो बांधकामं या परिसरात उभी ठाकली असून त्यांतून मुख्यत: मुंबईतून स्थलांतरित झालेला मराठीभाषिक तसेच परप्रांतीय लोक जास्त आहेत. इथे बांधकाम क्षेत्रात जवळपास सर्व पक्षांचे दिग्गज नेते एकसाथ काम करतात. वसई-विरार येथे एफएसआय वाढवून मिळावा म्हणून सर्व बिल्डर एकत्र आहेत. राजकीय पक्षही याबाबती मूग गिळून गप्प आहेत. हरित वसई संरक्षण समितीने त्यांना विरोध केला. या भागातील अनधिकृत बांधकामं पाडून टाकावीत म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची २००७ ते २०१३ दरम्यान अनेकदा सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने शेवटी निर्णय दिला आणि अनधिकृत बांधकामं पाडण्यास सरकारला बजावलं. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही. ठाकूर यांनी मुंबई आणि वसईतील अनेक पत्रकारांना अल्प किमतीत किंवा अगदी मोफतही सदनिका दिल्या आहेत, हे वास्तव आहे.
राजकारण करत असतानाच हितेंद्र ठाकूर यांनी शैक्षणिक तसेच वैद्यकीय संस्था उभारल्या. आधुनिक प्रणालीवर उभारलेल्या या संस्थांतून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे या मंडळींचा पाठिंबा मतदानाच्या रूपात ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मिळतो आहे. आशियातील एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे. भारतातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी संस्था उभारून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे जगप्रसिद्ध बिल गेट्स यांच्यासारख्या महनीय व्यक्तींना ठाकूर यांनी विरारमध्ये आणलेच; परंतु श्री श्री रविशंकर यांचेही येथे आगमन झाले आहे. अशा उपक्रमांतून आज तरुण आणि ज्येष्ठांचा जनसमुदाय त्यांच्यामागे उभा राहिला आहे आणि हीच खरी आज त्यांची राजकीय शक्ती आहे.
रामायणात वाल्याचा वाल्मीकी आणि बायबलमध्ये शौलाचा संत पौल झाला. वसईतील ठाकूर बंधूंनाही त्या मार्गावर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. २०१० साली त्यावेळचे खासदार बळीराम जाधव आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर वाघोलीसारख्या गजबजलेल्या गावात हल्ला झाला. त्यात खासदार जाधव जखमी झाले. खासदार जाधव यांना मी माझे मित्र व किलरेस्कर कंपनीचे माजी अधिकारी अरुण राऊत यांच्यासह त्यांच्या घरी जाऊन भेटलो तेव्हा खासदार जाधव म्हणाले की, ‘‘हितेंद्र ठाकूर यांनी हे प्रकरण मिटवलं आहे.’’ सध्या इथे अशी परिस्थिती आहे, की ठाकुरांचं नाव घेण्याचीही एकेकाळी ज्यांची हिंमत नव्हती, तेही आज त्यांच्यावर टीका करताना दिसतात. याचा अर्थ त्यांची दहशत आता खरोखरच संपलेली आहे.
मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला पंधरा हजार मतं कमी मिळाली, तर नालासोपारा मतदारसंघात जवळपास तेवढय़ाच मतांचा फरक होता. त्याचं कारण काँग्रेसचा दिल्ली-मुंबईचा कारभार व मोदी यांचा झंझावात! या मतदारसंघातील गुजराती व बहुसंख्य हिंदी भाषिक मतदार यावेळी भाजपाकडे- म्हणजे मोदींकडे वळले. याचाच अर्थ त्यांच्या राजकीय प्रभावालाही आता ओहोटी लागल्याचं दिसतं. एका नव्या पर्वाची ही सुरुवात म्हणायची की तात्पुरती पीछेहाट, हा मात्र प्रश्न आहे.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक