6 Places In India Where Indians Require Special Permission: सांस्कृतिक वैविध्य व समृद्ध वारसा लाभलेल्या भारतभूमीत अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत ज्यांची भुरळ परदेशी नागरिकांनाही पडते. भारतात अतिथी देवो भवः अशी मान्यता असली तरी पर्यटकांना येण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन यावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का परवानगीचा नियम केवळ परदेशी पर्यटकांसाठी नाही तर तुमच्या आमच्या सारख्या भारतीय नागरिकांना सुद्धा लागू होतो बरं… भारतातील सर्वच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पर्यटनाचे नियम एकसारखे नाहीत. काही राज्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय नागरिकांना सुद्धा विशेष परवानगी घेऊनच प्रवेश घेता येतो. येत्या वर्षाअखेरीस तुम्ही एखादी छान ट्रिप प्लॅन करण्याच्या तयारीत असाल तर आणि यापैकी कोणत्याही पर्यटन स्थळांचा विचार करत असाल तर नेमके नियम काय आहेत हे जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इनर लाइन परमिशन म्हणजे काय?

भारतीय नागरिकांना सुद्धा भारतही काही राज्यनामध्ये पर्यटनासाठी इनर लाईन परमिशन मिळवणे अनिवार्य असते. मुख्यतः अशी राज्य ज्यांच्या सीमा या इतर देशांशी संलग्न आहेत तिथे काही वेळा कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागते. विशेष भागातील आदिवासी व मूळ समाजाच्या संरक्षणासाठी तसेच पर्यटकांच्या हितासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. इनर लाइन परमिशनचा नियम पाळणारी भारतातील ६ पर्यटन स्थळे आपण आज पाहुयात…

अरुणाचल प्रदेश

उत्तर-पूर्वेकडील संस्कृतीने समृद्ध असलेले हे राज्य चीन, भूतान आणि म्यानमारला जोडून आहे. या राज्यात प्रवासासाठी कोलकाता, शिलाँग, गुवाहाटी, दिल्ली या शहरांमधील निवासी आयुक्त तसेच अरुणाचल प्रदेश सरकारकडून परवाना घेणे आवश्यक आहे. या राज्यातील काही संरक्षित क्षेत्रांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशात पर्यटनासाठी भारतीय नागरिकांना ३० दिवसांच्या वैधतेसह प्रति व्यक्ती सुमारे १०० रुपये खर्च करून परवाना प्राप्त करता येतो.

नागालँड


नागालँड हे अनेक जमातींचे निवासस्थान आहे तसेच या राज्याची सीमा म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय सीमेसह जोडून आहे. या संवेदनशील क्षेत्रात प्रवासासाठी भारतीयांना दिल्ली, कोलकाता, कोहिमा, दिमापूर, शिलाँग आणि मोकोकचुंग येथील उपायुक्तांकडून इनर लाईन परमिशन मिळू शकते.

लक्षद्वीप

भारतापासून काहीसा दूर असणारा हा द्वीपसमूह पर्यटनाच्या दृष्टीने भारताला लाभलेले मौल्यवान रत्न आहे. लक्षद्वीप येथील स्वच्छ समुद्रकिनारे आणि निळसर पाणी तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात. या केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करण्यासाठी पोलिस मंजुरी प्रमाणपत्र आणि विशेष परवानगी आवश्यक आहे.

मिझोराम

निसर्गाचे वरदान असणारे मिझोराम राज्य म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेलगत आहे. तसेच मिझोराम येथील काही भाग हे आदिवासी जमातींचे निवासस्थान आहे. भारतीय पर्यटकांना मिझोराममध्ये पर्यटनासाठी मिझोराम सरकारकडून तसेच सिलचर, कोलकाता, शिलाँग, दिल्ली, गुवाहाटीयेथील संपर्क अधिकाऱ्यांकडून परवानगी घेता येऊ शकते. जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर लेंगपुई विमानतळ, ऐझवाल येथे पोहोचल्यावर सुरक्षा अधिकाऱ्याकडून विशेष पास घेऊ शकता.

हे ही वाचा << Video: जन्मतःच बाळाचं नाव नाही Tune ठरवली जाते; भारतातील ‘या’ Whistling Village ची प्रथा आहे खूपच भारी

सिक्किम

हिमालयाचे प्रवेशद्वार अशी ओळख असणारे सिक्किम हे राज्य सुंदर हिरवळ, तलाव, नानाविध पाककृती, बुद्ध भिक्षूंच्या प्रार्थनास्थळांनी नटले आहे. भारताच्या ईशान्य भागात वसलेल्या सर्वात लहान राज्यांपैकी एक अशा सिक्कीममध्ये पर्यटनासाठी काही उंचीवरील ठिकाणे जसे की, त्सोमगो बाबा मंदिर ट्रिप, सिंगलिला ट्रेक, नाथला पास, झोंगरी ट्रेक, थांगू-चोपटा व्हॅली ट्रिप, युमेसामडोंग, युमथांग आणि झिरो पॉइंट ट्रिप. आणि गुरुडोगमार तलाव येथे विशेष परवानगी आवश्यक असते. हे परमिट पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडून जारी केले जाते आणि बागडोगरा विमानतळ आणि रंगपोचेक पोस्टवर मिळू शकते.

लडाख

प्रत्येक प्रवाशाच्या बकेट लिस्टमध्ये असणारे नाव म्हणजे लेह लडाख. लडाख येथील काही भाग जसे की, नुब्रा व्हॅली, खार्दुंग ला पास, त्सो मोरीरी लेक, पँगॉन्ग त्सो लेक, दाह, हनु व्हिलेज, न्योमा, तुर्तुक, दिगर ला, टांग्यार यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी अंतर्गत लाईन परमिट आवश्यक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 places in india where indian travelers need special permission 2022 year end trip guide in cheap rate svs
First published on: 28-11-2022 at 10:53 IST