Mango City Of India Malda : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या संपूर्ण भारतात अनेक प्रजाती आढळतात, ज्यातील प्रत्येक जातीची स्वत:ची चव आणि ओळख आहे. भारतात प्रत्येक राज्यानुसार आंब्याची जात बदलते. म्हणजे कोकणात हापूस, पायरी आंबा मिळतो; त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये लंगडा, बदामी, दसरी, चौसा, तोतापुरी, केसर या जातींचा आंबा मिळतो. तु्म्हीदेखील यातील अनेक आंब्यांचे प्रकार चाखले असतील. यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आंब्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण भारतात असं एक शहर आहे, ज्याला आंब्यांचे शहर (मँगो सिटी) म्हणून ओळखले जाते.

आंब्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदेशांपैकी पश्चिम बंगालमधील मालदा या शहराने या फळाशी एक घट्ट नाते जोडले आहे. राज्याच्या उत्तर भागात वसलेले मालदा हे शहर भारताचे आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाते.

मालदा जिल्ह्यातील आंबे जिल्ह्याबाहेर दूरवर पोहोचतात. त्यांचा पुरवठा देशाच्या विविध भागांमध्ये केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही निर्यात केला जातो.

या प्रदेशाचा आंब्याच्या लागवडीशी असलेला संबंध अलीकडचा नाही. ऐतिहासिक नोंदींवरून असे सूचित होते की, मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात एके काळी पाल साम्राज्याचा भाग असलेल्या या प्रदेशात आंब्याच्या बागा होत्या, ज्या स्थानिक व्यापाराला आधार देत होत्या.

नंतर बंगाल सल्तनत आणि मुघल राजवटीत मालदा एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले आणि आंबे हे तेथील एक ओळखले जाणारे उत्पादन बनले.

या प्रदेशाच्या नद्यांनी ही ओळख घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. गंगा आणि महानंदा नद्यांच्या जवळ वसलेल्या मालदाची माती सुपीक गाळाची आहे. उन्हाळा आणि मोसमी पर्जन्यमान असलेले येथील हवामान मोठ्या क्षेत्रावर आंब्याच्या लागवडीसाठी पोषक आहे.

फळबागा संपूर्ण भूभागावर पसरलेल्या आहेत, ज्यामुळे एक अशी संघटित प्रणाली तयार झाली आहे जिने पिढ्यानपिढ्या उत्पादन टिकवून ठेवले आहे.

मालदा हे फाजली, लंगडा, हिमसागर आणि लक्ष्मणभोग यांसारख्या आंब्याच्या अनेक जातींच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. या प्रत्येक जातीचे स्वतःचे हंगामचक्र आणि बाजारपेठेतील मागणी असते. त्यांपैकी फाजली आंबा त्याच्या आकारासाठी आणि हंगामाच्या शेवटी उपलब्ध होण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे इतर प्रदेशांच्या तुलनेत पुरवठ्याचा कालावधी वाढतो.

उत्पादनाचे प्रमाण हा आणखी एक घटक आहे. मोठ्या फळबागा आणि प्रस्थापित शेती पद्धतींमुळे सातत्यपूर्ण उत्पादन शक्य झाले आहे. या प्रदेशातील शेतकऱ्यांनी बदलत्या बाजारपेठेच्या गरजांशी जुळवून घेताना पारंपरिक पद्धती चालू ठेवल्या आहेत.

फळबागांपासून स्थानिक बाजारपेठांपर्यंत आणि नंतर इतर राज्यांपर्यंत व निर्यात मार्गांपर्यंत जाणारी पुरवठा साखळी काळानुसार विकसित झाली आहे.

मालदा आंब्यांची चव अनेकदा त्या प्रदेशातील माती आणि हवामानाच्या परिस्थितीशी जोडली जाते. नदीकाठची माती आणि मोसमी हवामानाचा संयोग फळाच्या पोत आणि चवीला हातभार लावतो. यामुळे या जिल्ह्याला व्यापारी आणि ग्राहकांमध्ये आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे, त्यामुळे मालदाची ‘आंब्याचे शहर’ म्हणून असलेली ओळख केवळ उत्पादनापुरती मर्यादित नाही. ती इतिहास, भूगोल आणि लागवडीच्या सातत्यामुळे घडली आहे. आजही येथील फळबागा स्थानिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत आणि हे फळ भारताच्या कृषी नकाशावर या प्रदेशाचे स्थान निश्चित करत आहे.